पुणे –
धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे मुळा, मुठा, पवना व रामनदीकाठी असलेल्या पुणे शहर, पिंपरी चिंचवड महानगर पालिका व पुणे
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वीज यंत्रणा पाण्याखाली गेल्यामुळे सोमवारी जवळपास ३० हजार ग्राहकांचा वीज पुरवठा बंद
खंडित होता. पाण्याचा विसर्ग रविवारपेक्षा सोमवारी जास्त वाढल्याने सोमवारी या भागातील महावितरणची वितरण व्यवस्था
कोलमडली असून त्याला पुन्हा सुरळीत करण्यासाठी काही दिवसाचा कालावधी लागणार आहे.
रविवार दि ४ ऑगस्ट सकाळपासून प्रभावित क्षेत्रातील वीज पुरवठा नागरिकांच्या सुरक्षतेसाठी बंद करण्यात आला होता. सोमवारी
सकाळी पुन्हा पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने मोठ्या संख्येने महावितरणचे ग्राहक प्रभावित झाले असून खबरदारी म्हणून त्यांचा
वीजपुरवठा खंडित करावा लागला.
प्राप्त माहितीनुसार महावितरणच्या शिवाजी नगर विभागातील जवळपास ९ हजारापेक्षा जास्त ग्राहकांचा वीजपुरवठा सुरक्षतेचा
उपाय म्हणून बंद करण्यात आला. यात प्रामुख्याने औंध, बाणेर, बालेवाडी, बावधान, खडकी, बोपोडी, पी.एम.सी बिल्डिंग परिसर
या भागाचा समावेश आहे. पाण्याखाली येऊन अपघात होण्याची शक्यता असल्यामुळे या विभागातील ६५ रोहित्र बंद करण्यात आले
आहेत.
त्याचप्रमाणे पिंपरी विभागातील जवळपास २७०० ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला. यात प्रामुख्याने जुनी संघवी, मधुबन
कॉलोनी, पिंपळे गुरव, चिंचवड, संजय गांधी नगर, कासारवाडी, वाकड, कस्पटे वस्ती, पवनानगर, पिंपळे निलख, काळेवाडी व
शिवतीर्थ या भागाचा समावेश आहे. या विभागातील ३० रोहित्रे खबरदारी म्हणून बंद करण्यात आलेली आहेत.
मुळशी विभागातील जवळपास ११६६५ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला. यात मुळशी तालुक्यातील गावे, पूर्व हवेली
तालुक्याचा भाग, उरली कांचन, मांजरी, आष्टापूर, रीहे, पौड, लवाळे, मान, लोणी, थेऊर, या गावांचा समावेश असून जवळपास
५०७ रोहित्रे बंद करण्यात आलेली आहेत.
बंडगार्डन विभागातील मांजरी, मुंढवा, वाडिया, इ. परिसरातील जवळपास ६५० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.
त्याचप्रमाणे नगर रोड विभागातील विश्रांतवाडी व वडगावशेरी येथील जवळपास ६०० ग्राहकांचा वीज पुरवठा बंद करण्यात आला.
त्याचप्रमाणे कोंढवा, पिसोळी, इ. भागातील काही ग्राहकांचा वीज पुरवठा नागरिकांच्या सुरक्षतेसाठी बंद करावा लागला.
महावितरण प्रशासनाकडून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न चालू असून महावितरणचे अधिकारी व कर्मचारी
अहोरात्र मेहनत करीत आहे. ग्राह्कांकडून महावितरणला सहकार्य मिळत असून पाण्याचा ओघ कमी झाल्यावर तातडीने वीजपुरवठा
सुरळीत करण्याचा महावितरणकडून प्रयत्न करण्यात येणार आहे. कोठे तार तुटून पडली असेल तर याची सूचना महावितरणच्या टोल
फ्रि क्रमांक १८००१०२३४३५/१८००२३३३४३५ / १९१२ वर द्यावी,असे आवाहन करण्यात आले आहे.