मुंबई:
कोणत्याही कारणांनी वीजपुरवठा खंडित झाल्याने ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन गेल्या तीन-चार वर्षांत वीज वितरण क्षेत्रात झालेल्या चांगल्या कामांच्या बळावर ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी काम करा, अशा सूचना ऊर्जामंत्री ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या. तसेच या कामात कुचराई करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
महावितरणच्या राज्यभरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आज मुंबई मुख्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित बैठकीत ना. ऊर्जामंत्री बोलत होते. या बैठकीस प्रधान ऊर्जा सचिव श्री. अरविंद सिंग, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार, महाराष्ट्र राज्य वीज मंडळ सूत्रधारी कंपनीचे संचालक श्री. विश्वास पाठक, संचालक (संचालन) श्री. दिनेशचंद्र साबू, संचालक (प्रकल्प) श्री. भालचंद्र खंडाईत, संचालक (मा.सं) ब्रिगेडियर श्री. पवन कुमार गंजू उपस्थित होते. ऊर्जामंत्री ना. श्री. बावनकुळे म्हणाले, सध्या अतिरिक्त वीज उपलब्ध असतांनाच्या कालावधीत मोठ्या शहरातील खंडित विजेचे प्रमाण शून्यावर आले पाहिजे. त्यादृष्टीने नियोजन करून प्राधान्यक्रम ठरवावेत व त्यानुसार काम करावे. मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात दौरे करून वीज ग्राहकांच्या समस्या जाणून घ्याव्यात व स्थानिक अधिकाऱ्यांच्या समन्वयातून त्या सोडवाव्यात. ग्रामीण भागात यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात विजेचे खांब पडले आहेत. यापुढे ग्रामीण भागातही नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून विजेचे खांब उभारण्याची कामे करावीत, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांनी सांगितले की, मोठ्या वीज ग्राहकांचा वीजपुरवठा थोड्या कालावधीसाठी खंडित झाला तरी त्यांचे प्रचंड नुकसान होते. त्यामुळे अशा ठिकाणी महिन्यातून एकदाच देखभाल-दुरुस्तीची कामे करावीत व यासंदर्भात संबंधित ग्राहकांना प्रणालीद्वारे माहिती द्यावी. तसेच बैठकीत एकात्मिक ऊर्जा विकास, पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती, उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे कृषिपंपांना जोडणी, मुख्यमंत्री सौर कृषिपंप आदी योजनांच्या कामांचा आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
महावितरणच्या पेमेंट वॉलेटचे लोकार्पण
वीज ग्राहकांना विशेषतः ग्रामीण भागात वीजबिल भरणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी महावितरणने स्वतःचे डिजिटल पेमेंट वॉलेट तयार केले आहे. या वॉलेटचे ऊर्जामंत्री ना. श्री. बावनकुळे यांच्या हस्ते प्रकाशगड मुंबई येथे महावितरणच्या मुख्यालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे लोकार्पण करण्यात आले. वॉलेटमुळे ग्राहकांना वीजबिल भरण्याच्या सोयीसोबतच देयकाच्या वसुलीतून मिळणाऱ्या कमिशनच्या माध्यमातून अनेकांना उत्पन्नाचे नवीन साधन उपलब्ध होणार आहे.