पुणे : महावितरणमधील कर्मचाऱ्यांना सोपविण्यात आलेल्या कामांचे योग्य नियोजन करून ते अधिक सुटसुटीतपणे व प्रभावीपणे करता यावे यासाठी मनुष्यबळ पुनर्रचना आराखडा तयार करण्यात आला आहे, अशी माहिती कार्यकारी संचालक श्री. श्रीकांत जलतारे यांनी दिली.
येथील महावितरणच्या प्रशासकीय इमारतीमध्ये नुकत्याच झालेल्या मनुष्यबळ पुर्नरचना संदर्भात संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार, अधीक्षक अभियंता श्री. सुंदर लटपटे, श्री. पंकज तगलपल्लेवार, श्री. राजेंद्र पवार, श्री. वादिराज जहागिरदार यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात कार्यकारी संचालक श्री. जलतारे यांनी मनुष्यबळ पुर्नरचना आराखड्याचे सादरीकरण केले व माहिती दिली.
कार्यकारी संचालक श्री. जलतारे म्हणाले, की सध्याच्या रचनेत महावितरणमध्ये एकाच कर्मचारी किंवा अधिकाऱ्याला निरनिराळी कामे करावी लागतात. त्यामुळे एक काम करताना दुसऱ्या कामात अनपेक्षित किंवा कोणताही हेतू नसताना उणिवा राहून जातात. काम अपूर्ण राहते. लांबणीवर जाते. सोबतच कंपनीचे उद्दिष्ट साध्य होत नाही. एकाचवेळी एकच व्यक्ती अनेक प्रकारचे काम करीत असताना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष त्याच्यावर मानसिक व शारीरिक ताण येतो. आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. या पार्श्वभूमिवर कर्मचारीहितासाठी कार्यात्मक पुनर्रचना करणे ही काळाची गरज होती. या पुनर्रचनेमध्ये बिलिंग, महसूल, देखभाल व दुरुस्ती ही कामे स्वतंत्रपणे करण्यात येणार आहे. पुनर्रचनेच्या आराखड्यातील सर्व कर्मचार्यांचे जॉब चार्ट तयार करण्यात आले आहेत. यासोबतच ग्रामीण भागातील उपविभाग अधिक बळकट करण्यात येणार आहेत. हे सर्व करीत असताना मंजूर पद व कर्मचारी संख्येत कोणतीही कपात होणार नाही. पदोन्नतीवर कोणताही परिणाम होणार नाही. ग्राहकांची वाढती संख्या तसेच भविष्यातील ग्राहकसेवा याचा सध्याच्या रचनेतील ताण कमी करण्यासाठी ही कार्यात्मक पुनर्रचना करण्यात येत आहे.
मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार म्हणाले, की क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना सध्या अनेक प्रकारचे कामे करावे लागतात. परिणामी कामाचा तणाव निर्माण होतो व आरोग्यावरही परिणाम होतो ही बाब अनेक कर्मचारी संघटनांनी मुख्यालयाला निदर्शनास आणून दिली होती. त्याचाही प्रामुख्याने विचार करून या पुनर्रचनेत प्रत्येक कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामांची जबाबदारी व कर्तव्ये नेमून देण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्यास कामाचे योग्य नियोजन करणे सोयीचे होईल व त्याचा थेट फायदा वीजग्राहकांना होणार आहे.
यावेळी उपस्थित सर्व संवर्गातील कर्मचारी, अधिकाऱ्यांनी आराखड्याबाबत काही मते, बदल सूचविले. प्राप्त झालेल्या सर्व सूचना व मागण्यांची यावेळी नोंद करून घेण्यात आली. यावेळी सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) श्री. अशोक केदारे (मुंबई), श्री. राजेंद्र म्हकांळे (पुणे), सहाय्यक महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) सौ. माधुरी राऊत, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. रामगोपाल अहिर आदींसह अभियंते, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.