पुणे: येत्या तीन वर्षात राज्यातील 90 टक्के शेतीपंपांना सौर कृषीवाहिन्यांच्या माध्यमातून सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतीपंपांना दिवसा वीजपुरवठा होणार असून सध्याच्या वीजपुरवठ्याचा प्रतियुनिट दरही निम्म्यावर येणार आहे, अशी माहिती राज्याचे ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी (दि. 21) दिली.
वारजे येथील आदित्य गार्डन सिटी सोसायटीमध्ये 150 किलोवॅट सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन ऊर्जामंत्री ना. श्री. बावनकुळे यांच्याहस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार श्री. भीमराव तापकिर, महाऊर्जाचे महासंचालक श्री. राजाराम माने, एमएसईबी सुत्रधारी कंपनीचे संचालक श्री. विश्वास पाठक, महावितरणचे प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे, नगरसेवक श्री. दिलीप बराटे, नगरसेवक श्री. सचिन दोडके, नगरसेविका सौ. दिपालीताई धुमाळ, नगरसेविका सायलीताई वांजळे तसेच सोसायटीच्या अध्यक्ष सौ. साक्षी महाले आदींची उपस्थिती होती.
ऊर्जामंत्री ना. श्री. बावनकुळे म्हणाले, की पूर्वी सौरऊर्जेवरील वीजनिर्मितीसाठी प्रतियुनिट 16 रुपये खर्च येत होता. केंद्र व राज्य शासनाने सौरऊर्जा निर्मितीच्या धोरणाला वेग दिल्याने सद्यस्थितीत हा खर्च प्रतियुनिट तीन ते साडेतीन रुपयांवर आलेला आहे. त्यामुळे राज्यात सौरऊर्जा निर्मितीला अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली आहे. शहरी व ग्रामीण भागात सौरऊर्जेवरील प्रकल्पांत वाढ होत आहे. यासोबतच राज्यातील सुमारे 45 लाख शेतीपंपांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी राज्य शासनाने सौर ऊर्जेवरील कृषीवाहिन्यांच्या प्रकल्पाला चालना दिलेली आहे. या महत्वाकांक्षी सौर प्रकल्पाद्वारे येत्या तीन वर्षात राज्यातील 90 टक्के शेतीपंपांना वीजपुरवठा करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे सध्या पारंपरिक वीजनिर्मितीद्वारे शेतीपंपांना वीजपुरवठ्यासाठी येणारा प्रतियुनिट सहा रुपये खर्चही तीन रुपयांवर येणार आहे. याशिवाय कोळशावरील सुमारे 2500 मेगावॉट विजेची मागणी कमी होईल व त्याचा पर्यावरणाला फायदा होणार असल्याचे ऊर्जामंत्री ना. श्री. बावनकुळे यांनी सांगितले.
यावेळी आमदार भीमराव तापकिर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. विवेक रत्नपारखी यांनी केले तर सोसायटीचे माजी अध्यक्ष श्री. सुनील ठाकरे यांनी सूत्रसंचालन केले. नगरसेवक श्री. सचिन दोडके यांनी आभार मानले.