पुणे : पुणे परिमंडलाचे कार्यक्षेत्र असलेल्या हवेली, खेड, मावळ, जुन्नर, आंबेगाव, मुळशी तालुक्यांतील 90 हजार 517 कृषीपंपधारक शेतकर्यांना नुकत्याच जाहीर झालेल्या मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेच्या माध्यमातून वीजबिलाच्या थकबाकीतून मुक्त होण्याची संधी मिळाली आहे.
राज्य शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत दि. 31 मार्च 2017 पर्यंत असलेल्या मूळ थकबाकीचा हप्त्यांनी भरणा केल्यास व्याज व दंड माफ केले जाणार आहे. यात हवेली, खेड, मावळ, जुन्नर, आंबेगाव, मुळशी तालुक्यांतील 90 हजार 517 कृषीपंपधारकांकडे 231 कोटी 65 लाख रुपयांची एकूण थकबाकी आहे. यातील 185 कोटी रुपयांच्या मूळ थकबाकीचा दिलेल्या हप्त्यांचा चालू वीजबिलांसह भरणा केल्यास त्याच प्रमाणात 44 कोटी 32 लाख रुपयांचे व्याज व 2 कोटी 30 लाख रुपयांचा दंड माफ करण्याचा राज्य शासन विचार करणार आहे.
पुणे परिमंडलात 71 हजार 529 कृषीपंपधारकांकडे प्रत्येकी 30 हजार रुपयांपेक्षा कमी अशी एकूण 90 कोटी 42 लाख रुपयांची मूळ थकबाकी आहे. त्यामुळे या कृषीपंपधारकांना प्रत्येक तीन महिन्यांच्या कालावधीत समान 5 हप्ते देण्यात येईल. त्यानुसार मूळ थकबाकीचा चालू वीजबिलांसह भरणा केल्यास व्याज व दंडाचे 18 कोटी 48 लाख रुपये माफ होऊ शकतील. तसेच प्रत्येकी 30 हजार रुपयांपेक्षा अधिक मूळ थकबाकी असणार्या 18 हजार 988 कृषीपंपधारकांकडे 94 कोटी 59 लाख रुपयांची मूळ थकबाकी आहे. ही थकबाकी प्रत्येकी दीड महिन्यांच्या 10 समान हप्त्यांत चालू वीजबिलांसह भरल्यास 28 कोटी 85 लाख रुपयांचे व्याज व दंड माफ होऊ शकतील.
पुणे परिमंडलातील थकबाकीदार कृषीपंपधारकांनी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभागी होऊन थकबाकीमुक्त व्हावे तसेच माहिती घेण्यासाठी किंवा सहभागी होण्यासाठी संबंधित कार्यालयांशी संपर्क साधावा असे आवाहन असे आवाहन महावितरणने केले आहे. योजनेत सहभागी न झालेल्या कृषीपंपधारकांकडून नियमानुसार थकबाकी वसुली किंवा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई होणार आहे.
योजनेचे विशेष वीजबिल
न मिळाल्यास संपर्क साधा
मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेसाठी थकबाकीदार कृषीपंपधारकांना विशेष वीजबिल देण्यात येत आहेत. यामध्ये संबंधीत ग्राहकांकडे असलेली एकूण थकबाकी, भरावयाची मूळ थकबाकी व त्यासाठी हप्त्यांची संख्या व रक्कम याबाबतची माहिती या विशेष वीजबिलात देण्यात आली आहे. वीजबिल वाटपाची प्रक्रिया वेगाने सुरु आहे. जून 2017 चे त्रैमासिक चालू वीजबिल भरून 15 नोव्हेंबरपर्यंत या योजनेत सहभागी व्हावे लागणार असल्याने हे विशेष वीजबिल न मिळाल्यास थकबाकीदार कृषीपंपधारकांनी महावितरणच्या संबंधीत कार्यालयाशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.