काश्मिर प्रश्न घरातील असून त्याला प्राधान्य द्या जनता दलाचे (यु) अध्यक्ष व खासदार शरद यादव यांचे प्रतिपादन
पुणे : काश्मिर प्रश्न हा दिवसेंदिवस गंभीर होत असून संसदेत त्यावर विस्तृत चर्चा होत आहे. सरकार सोबत विरोधी पक्षाची याबाबत बैठकही झाली आहे. काश्मिरची समस्या एका दिवसाची नसून ती सोडविण्याकरीता राजकीय मार्ग काढायला हवा. काश्मिरचा मुद््दा देशाच्या एकतेच्या दृष्टीने महत्त्वाचा असून सरकारने आधी काश्मिरसारख्या घरातील प्रश्न सोडविण्याकरीता प्राधान्य द्यायला हवे, असे जनता दलाचे (यु) अध्यक्ष व खासदार शरद यादव यांनी सांगितले.
जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस्च्या २१ व्या वर्धापनदिनानिमित्त प्रा.डॉ.सुधाकर जाधवर शैक्षणिक संकुल, मानाजीनगर, न-हे येथे झालेल्या कार्यक्रमापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते.
शरद यादव म्हणाले, देशातील जातीव्यवस्थेमध्ये स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांनीदेखील बदल झालेला नाही. यामुळे देश कमजोर होत असल्याचे चित्र आहे. बिहारमध्ये आम्ही दारुबंदीचे मोठे काम हाती घेतले आहे. त्यातदेखील अनेक समस्या निर्माण होत असल्या, तरी त्या सोडविण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. आपले पंतप्रधान गोरक्षणाची चर्चा करतात, परंतु आज देशातील नागरिक किती सुरक्षित आहेत, असा नागरिकांच्या रक्षणाविषयी सवालही त्यांनी यावेळी केला.
ते पुढे म्हणाले, देशातील भ्रष्टाचार वाढत असताना बांधकाम व्यावसायिकांच्या हलगर्जीपणामुळे पुण्यामध्ये इमारत कोसळ्याची घटना घडली. यामध्ये मजूरांचे प्राणही गेले. अशा घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना दोन लाख इतकी भरपाई देऊन न्याय देण्यात आला. या घटनांवरुन बांधकाम व्यावसायिक नियम पाळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अच्छे दिन आले आहेत, असे म्हणताना देशाची स्थिती सुधारण्याऐवजी पूर्वीपेक्षा वाईट झाली आहे. उत्तरप्रदेशातील निवडणुकांमध्ये सध्या तरी एकटे लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.