पुणे- गणेशोत्सव ;सामाजिक एकता व सलोख्याचं प्रतिक असून यंदाचे वर्ष महाराष्ट्राच्या दृष्टीकोनातून आव्हानात्मक आहे. सांगली, कोल्हापूर व कोकण भागात अतिवृष्टी व पुरामुळं अतोनात नुकसान झालेलं असतानाच मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागात अद्याप पाऊस न पडल्याने दुष्काळाची परिस्थिती आहे. माझ्या महाराष्ट्रातल्या अन्नदात्यावरील हे संकट व दुष्काळाचे ढग दूर होऊ देत हीच श्री गणराया चरणी प्रार्थना आहे. असे आज येथे खासदार संजय काकडे आणि उषा काकडे यांनी म्हटले आहे . आज आपल्या निवासस्थानी काकडे कुटुंबीयांनी आराधनेने गणेशाची प्रतिस्थापना केली .
यावेळी ते म्हणाले ,’श्री गणेश ही बुद्धीची देवता. कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणपतीच्या पूजनानं आणि त्याचा आशिर्वाद घेऊनच आपण करतो. श्री गणरायाला इतकं महत्व आपल्या भारतीय संस्कृतीत आहे. आणि हे महत्व ओळखूनच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटिशांविरोधात भारतीयांमध्ये जनजागृती करण्यासाठी व त्यांच्यात एकी निर्माण करण्यासाठी म्हणून गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले.
सार्वजनिक गणेशोत्सव शतकोत्तर रौप्य महोत्सव पार करून पुढे आलाय. आता हा गणेशोत्सव महाराष्ट्राच्या संस्कृतीचं विशेष अंग बनला आहे. गणेशोत्सवाला फक्त धार्मिक स्वरूप नसून सामाजिक, सांस्कृतिक दृष्टीकोनातून सार्वजनिक गणेशोत्सव अतिशय महत्त्वाचा व समाजाचा अविभाज्य घटक बनला आहे.
ब्रिटिशांविरोधात भारतीय समाजात एकी निर्माण करण्याच्या उद्देशाने सुरू झालेला गणेशोत्सव हा सामाजिक एकता व सलोख्याचं प्रतिक बनला आहे. फक्त हिंदू नव्हे तर, मुस्लिम, बौद्ध, शीख इत्यादी अनेक समाज बांधवदेखील सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना दिसतात. हेच भारतीय एकतेचं प्रतिक आहे.
अतिशय उदात्त हेतुतून सुरू झालेला हा गणेशोत्सव सार्वजनिक स्तरावर आता आणखी उच्च पातळीवर नेण्याची जबाबदारी तुम्हा-आम्हा सर्वांचीच आहे. याचं भान आपण सर्वांनी ठेवायला हवे. गणेशोत्सवाच्या आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!