मुंबई- शिरुर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवास्थानी जाऊन भेट घेतली. सकाळी 11.30 वाजता अमोल कोल्हे ‘कृष्णकुंज’वर दाखल झाले. अमोल कोल्हे यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान कोल्हेंनी या भेटीमागचे कारण सांगितले आहे.
अमोल कोल्हे म्हणाले, “ही सदिच्छा भेट होती. राज ठाकरे यांच्या सभेचा चांगला इम्पॅक्ट झाला. त्यासाठीच राज ठाकरे यांचे आभार मानण्यासाठी, त्यांची भेट घेतली.”
अमोल कोल्हे आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी भाजप विरोधात जोरदार प्रचार केला होता, तसेच त्यांनी घेतलेल्या सभांना प्रचंड गर्दी झाली, गर्दीचे रुपांतर मतांमध्ये झाले नाही. पण शिरुरमध्ये अमोल कोल्हे यांनी शिवसेनेचे दिग्गज उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला. या विजयात राज ठाकरे यांनी घेतलेल्या सभेचा परिणाम दिसून आला, अशी भावना अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली.
पुण्यातील खडकवासला इथे राज ठाकरे यांनी प्रचारसभा घेतली होती. हे सभास्थळ जरी बारामती लोकसभा मतदारसंघात येत असले, तरी त्याचा परिणाम शिरुर, मावळ, बारामती आणि पुणे परिसरात अपेक्षित होता. शिरुरमध्ये अमोल कोल्हे यांना राज ठाकरे यांच्या सभेचा फायदा झाला आणि त्यांनी विजय मिळवला.