पुणे – सुहाना सफर ये मोसम हसीं……या मधुमतीतील दिलीपकुमारच्या गाण्याने सुरू झालेली दिलीप – राज – देवच्या सुवर्णंमय युगाची संगीतमय सफर त्यांच्या चाहत्यांनी अभी ना जाओ छोडकर अभी दिल भरा नहिं……..असं गुणगुणत भरल्या अंतकरणाने संपवली. सर्वजण त्यांच्या काळातील आठवणी मनात साठवत निरोप घेत असताना साहित्यिक मुकुंद टाकसाळे यांनी मराठी माणसाचा उत्सवी आनंद साजरा करण्याच्या “चटकदार खमंग….फराळ……नवे कपडे आणि सोबतीला टीपॉयवर किमान दोनतरी दिवाळी अंक हवेतच” या केलेल्या व्याख्येची प्रचिती येत होती.
निमित्त होते “मोहनगरी” या दिपीलकुमार – राजकपूर – देवानंद यांच्या मोहमयी….सुवर्णयुगाच्या दिवाळी विशेष अंकाच्या प्रकाशनाचे. मोहनगरीचा हा पहिलाच दिवाळी अंक असून तो दिलीप राज देव विशेषांक म्हणून संपादक आनंद लाकटक यांनी काढला आहे. अंकाचे प्रकाशन खास समारंभात न करता त्यांनी दिलीप राज देव यांच्या चाहत्यांना त्यांच्या युगाची आठवण त्यांच्याच गाजलेल्या चित्रपट गीतातून करून दिली. अंकाचे प्रकाशन विनोदी साहित्यिक मुकुंद टाकसाळे यांनी केले आणि मराठी माणसाच्या आनंदाची व्याख्या ही फक्त खमंग फराळ खाणंपिण आणि नवे कपडे यापुरती मर्यादित नसून ती वाचनाशीही निगडीत असल्याने किमान दोन तरी दिवाळी अंक टेबलावर लागतातच असे नमूद केले. हिंदी चित्रपट सृष्टी हा सुद्धा मराठी माणसाच्या किती जिव्हाळ्याचा विषय आहे हे समोरच्या रसिकांच्या गर्दीने अधोरेखीत केले.
संपादक आनंद लाटकर यांनी, चित्रपट सृष्टीशी संबंधित अंकाची संख्या तुलनेत कमी असल्याने मोहनगरी हा दिलीप राज देव विशेष दिवाळी अंक काढण्याचे धाडस केले आणि ते अनेकांच्या मदतीने पूर्णत्वास गेले. कॉलेजच्या दिवसात मॅटिनी चित्रपट बघण्यापासून सुरू झालेली हिंदी चित्रपट कलाकारांबद्दलची आवड आज परिपक्व होत असून हा इमोशनल मॅडनेस असल्याचे त्यांनी निख्खळपणे कबूलही केले. यापुढे असेच वेगवेगळ्या विषयावरील दिवाळी अंक काढण्याचेही जाहीर केले.
हा दिवाळी अंकाचा टिपिकल प्रकाशन सोहळा नव्हता तर दिलीप राज देवानंदच्या सदाहबार युगाची संगीतमय सफऱ होती. झलकच्या यांच्या वाद्यावृंदाच्या साथीने अविनाश वैजापूरकर, आनंद लाटकर अभिजीत वाडेकर, प्रतिभा देशपांडे, श्रृती देवस्थळी आदींनी दिलीपकुमारच्या मधुमती, लीडर, राम और शाम, गंगाजमुना, राजकपूरच्या अनाडी, चोरीचोरी, मेरा नाम जोकर, श्री ४२०, छलिया, देवानंदच्या गाईड, हमदोनो, प्रेमपुजारी, तेरे घर के सामने, सोलनां साल, अशा गाजलेल्या निवडक पंधरा गाण्यांतून त्यांच्या चाहत्यांना ही सफर घडवून आणली. या संगीतमय सफरीचा शेवट अभी ना जाओ छोडकर के दिल अभी भरा नहिं….या गाजलेल्या गाण्याने झाली. हेच शब्द गुणगुणत… आपल्या तरूणपणच्या दिवसातील आठवणीत रमत रसिकांनीही निरोप घेतला.