स्त्रियांमध्ये सर्व समस्यांना तोंड देण्याचे सामर्थ्य -डॉ. जय गोरे
लातूर : “स्त्रियांमध्ये निसर्गत:च प्रचंड सामर्थ्य असते. त्या सामर्थ्याच्या जोरावर त्या कोणत्याही संकटांचा व समस्यांचा सामना करु शकतात. त्या सामर्थ्याच्या जोडीलाच त्यांच्यामध्ये तितकीच विनयशीलता देखील असते,जी त्यांना नेहमीच पाय जमिनीवर ठेवण्यास मदत करते.” असे प्रतिपादन जगप्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. जय गोरे यांनी केले. विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेतर्फे पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणाचे औचित्य साधून, शैक्षणिक, सामाजिक आणि अध्यात्माच्या समन्वयातून आयुष्यभर समाजप्रबोधन व सांप्रदायिक सद्भावनेचे कार्य, समर्पित भावनेने करून, समाजासमोर आदर्श निर्माण करणार्या पंचकन्यांना“पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड समर्पित जीवनगौरव पुरस्कार” डॉ. जय गोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. विवेकानंद हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. अशोक कुकडे हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार श्री. गोपाळराव पाटील हे होते.
याप्रसंगी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ दा. कराड, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण, माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समूहाचे उपाध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड, माईर्स एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक श्री. रमेशअप्पा कराड, माईर्स एमआयटीचे सचिव प्रा. डॉ. मंगेश तु. कराड, श्री. तुळशीराम दादाराव कराड, श्री. काशीराम दादाराव कराड व डॉ. हणमंत कराड हे उपस्थित होते.
रामेश्वर (रूई), ता.जि. लातूर येथे संपन्न झालेल्या या सोहळ्यात ज्येष्ठ साहित्यिका व लेखिका डॉ. माधवी वैद्य (पुणे), थोर समाजसेविका व शिक्षणतज्ञ प्रा. डॉ. जोस्का बंडर्स (द नेदरलँडस्), नामवंत शिक्षणतज्ञ व अध्यात्मिक क्षेत्रात कार्य करणार्या डॉ. मेहेर मास्टर मूस (मुंबई), थोर समाजसेविका व वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत डॉ. सौ. ज्योत्स्ना अशोक कुकडे (लातूर) व ज्येष्ठ समाजसेविका व भारूडकार सौ. चंदाताई जगदीश तिवाडी (पंढरपूर, जि.सोलापूर) यांना “पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड समर्पित जीवनगौरव पुरस्कार” तसेच, पाथर्डी, अहमदनगर येथील थोर समाजसेविका श्रीमती कौसल्याताई कोंडीबा ढाकणे यांना “ विशेष समर्पित जीवनगौरव पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, सुवर्णपदक व रोख रु. ११,०००/- (रुपये अकरा हजार) असे या पुरस्काराचे स्वरुप होते.
प्रा.डॉ. जय गोरे म्हणाले, “ आज स्त्रिया सर्वच पातळीवर स्वत:ला सिद्ध करतात. त्यांना मिळालेल्या प्रत्येक संधीचे त्या सोने करतात. नम्रतेचा अंगीकार केल्यावरच आपला सर्वांगीण विकास साध्य होऊ शकतो. या सोबतच आज भारतामध्ये वाहन अपघात आणि पाण्याचे दुर्भिक्ष्य या अत्यंत भयावह समस्या आहेत. कारण ज्या कुटुंबाचा आधार या समस्यामुळे गमावला जातो त्या कुटुंबाची सर्व जबाबदारी घरातल्या स्त्रीवर येऊन पडते. आणि तितक्याच ताकदीने ती स्त्री त्या जबाबदार्यांना पूर्ण न्याय देते. त्या समस्यांच्या निराकरणासाठी प्रत्येक व्यक्तीने आणि पर्यायाने समाजाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. ”
माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील म्हणाले, “ ज्या देशामध्ये व समाजामध्ये स्त्रीचा आदर केला जातो तो देश व समाज नेहमीच आदर्श म्हणवला जातो. आज समाजामध्ये गरीबी व श्रीमंतीचा भेद मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. समाजातील ही दरी कमी करण्यासाठी संधीची उपलब्धता करुन देणे गरजेचे आहे. ज्यामुळे निश्चितच समाजाची उन्नती साधली जाऊ शकते. आज संपूर्ण देशभरात स्त्रियांवर अन्यात व अत्याचार मोठ्या प्रामाणावर होत आहेत. ही स्थिती बदलण्यासाठी मुळातच पुरुषप्रधान मानसिकता बदलणे गरजेचे आहे. स्त्रियांना निर्णय प्रक्रियेत समावून घेतल्यास कुटुंबाचा व पर्यायाने समाजाचा चेहरा मोहरा बदलेल.”
डॉ. माधवी वैद्य म्हणाल्या, “ हा पुरस्कार म्हणजे मला मिळालेला पसायदानरुपी प्रसाद असून हा एक दिव्य साक्षात्कार आहे. आज ज्या पद्धतीने रामेश्वर गाव मी पाहिले आहे ते पाहता सर्वधर्मसमभावाचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे रामेश्वर (रुई) आहे. हीच भावना मनात घेऊन मी हा पुरस्कार स्वीकारला आहे.’
डॉ. जोत्सना कुकडे म्हणाल्या “जरी त्याच्याकडे जाण्याचे मार्ग वेगवेगळे असले तरी तो परमेश्वर एकच आहे. त्या सांप्रदायिक एकतेचा प्रत्यय या क्षणाला मला येत आहे. हा पुरस्कार मी माझ्या रुग्णांना व त्यांच्या कुटुंबियांना समर्पित करते ज्यांच्यामुळे मी घडले.”
प्रा. डॉ. जोस्का बंडर्स म्हणाल्या, “ भारतीय संस्कृतीचे यथार्थ दर्शन मला या ठिकाणी झाले असून, कुटुंब, त्यांचे प्रेम, एकमेंकाबद्दलची आत्मीयता यामुळे मी भारावले आहे. रामेश्वर येथील श्रीराम-रहीम मानवता सेतू ज्यामुळे दोन धर्मच नाही तर माणसं माणसांशी जोडली गेली आहेत.”
चंदाताई तिवाडी म्हणाल्या,“ रुई शिर्डी पासून माझ्या भारुडाच्या कार्यक्रमांचा श्रीगणेशा झाला. तर रामेश्वर रुई येथे माझ्या याच भारुडरुपी कळसावर मानाचा तुरा खोवला गेला.”
डॉ. मेहेर मास्टर मूस म्हणाल्या, “ज्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो त्यांचे आशिर्वाद फक्त आमच्या पुरतेच मर्यादित नसून, ते संपूर्ण समाजासाठी असणार आहेत. ज्याचा वसा आम्ही पुढेही सतत सुरु ठेऊ.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, “ भारतीय संस्कृती ही तिची मूल्ये, परंपरा व संस्कृतीमुळे ओळखली जाते. याच मूल्ये व परंपरांचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे प्रत्येक भारतीय स्त्री होय. भारतीय स्त्री ही त्याग, सहनशीलता, प्रेम व समर्पणाचे दुसरे रूप आहे. आज आमच्या हातून घडणार्या प्रत्येक चांगल्या गोष्टीमागे एका आदर्श व अदृश्य शक्तीचा वास आहे. ती शक्ती म्हणजे आमच्या मोठ्या भगिनी प्रयागअक्का कराड. त्यांनी जे काही आमच्या साठी केले त्याचाच वसा जपण्यासाठी आज या पंचकन्या अर्थात माझ्या पाच भगिनींना आम्ही सन्मानित केले आहे. सद्गुणांची सेवा हीच ईश्वरसेवा समजून या भगिनींचा सन्मान या ठिकाणी केला गेला आहे. या माझ्या बहिणींच्या त्याग, समर्पणामुळेच माझा भारत ओळखला जाईल.”
‘प्रयागधाम विश्वशांती दिंडी’चा प्रारंभ रामेश्वर (रुई) येथील संत श्री गोपाळबुवा महाराजांच्या समाधी मंदिररालगतच्या विश्वधर्मी श्रीराम-रहीम मानवता सेतूपासून झाला तसेच, हिंदू-मुस्लिमांनी एकत्र येऊन पुर्नबांधणी केलेल्याहजरत जैनुद्दीन चिश्ती दर्गा व जामा मस्जिद मार्गाने पुढे श्री राम मंदिरात दिंडी आल्यांनतर त्या ठिकाणी वैष्णव भजन व श्रीरामाची आरती झाली. तथागत गौतम बुद्ध विहार व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती विश्वशांती भवनाच्या ठिकाणी बौद्ध धर्माची प्रार्थना व बुद्धवंदना होऊन नंतर त्यागमूर्ती प्रयागअक्कांच्या समाधीसमोर भजन कीर्तनाने दिंडीची सांगता झाली.
श्रीमती कौसल्याताई कोंडिंबा ढाकणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
डॉ.एस.एन. पठाण यांनी प्रास्ताविक केले.
प्रा.डॉ.मिलिंद पांडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.डॉ. मंगेश तु. कराड यांनी आभार मानले.