पुणे- कल्पना, ज्ञान आणि संशोधन यांच्या संगमातूनच नवनिर्मिती आकाराला येते. नुसते शिक्षण उपयोगाचे नाही. त्याच्या जोडीला सृजनशीलता तितकीच महत्वाची आहे. त्यातून पाश्चात्य देशांप्रमाणे आपल्या देशातही वैज्ञानिक क्षेत्रात आमूलाग्र बदल घडेल. असे प्रतिपादन क्विक हील टेक्नॉलॉजीजचे संस्थापक डॉ. संजय काटकर यांनी केले.
भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दूल कलाम यांच्या जयंतीनिमित्त भारत सरकारने इनोव्हेशन डे म्हणून जाहीर केला आहे. त्याचे औचित्य साधून एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ कॉम्प्यूटर इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी आणि एमआयटी डब्ल्यूपीयू इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन्स कौन्सिल यांच्या सहकार्याने इनोव्हेशन डे म्हणून एमआयटी, कोथरूड येथे तो साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. इपीपीएस इन्फोटेकचे संचालक श्री. ज्योतिष वेरूळकर हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, प्र-कुलगुरू प्रा.डॉ. मिलिंद पांडे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीहरी होनवाड, डॉ. के. के. वरखडे, डॉ. मंगेश बेडेकर व डॉ. बी.एन.जगदाळे हे उपस्थित होते.
विविध ज्ञान शाखेत संशोधनात्मक कार्य केल्याबद्दल डॉ. मृदुला कुलकर्णी, डॉ. आरती खापर्डे, प्रा. समर्थ पटवर्धन यांना डॉ. एपीजे अब्दूल कलाम एमआयटी डब्ल्यूपीयू रिसर्च अॅण्ड इनोव्हेशन पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. तसेच, प्रा. प्रदीपकुमार ढगे व डॉ. हनुमंत मगर पाटील यांना डॉ. एपीजे अब्दूल कलाम एमआयटी डब्ल्यूपीयू रिसर्च अॅण्ड इनोव्हेशन मोटिव्हेशनल पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रा.अनिरूध्द चाबूकस्वार, डॉ. अमित जोमडे, प्रा.प्रतिभा उपाध्ये व प्रा.गिरीष मुडे यांना डॉ. एपीजे अब्दूल कलाम एमआयटी डब्ल्यूपीयू रिसर्च अॅण्ड इनोव्हेशन प्रॉमिसिंग पुरस्काराने गौरविण्यात आले.
सन्मानपत्र व ११ हजार रूपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
डॉ. संजय काटकर म्हणाले, माझे वडील एक सामान्य शेतकरी होते. परंतू त्यांनी पुण्यात येऊन एका कारखान्यात नोकरी धरली. त्यांच्या अंगी खूपच कौशल्य होते. परंतू पदवी नसल्यामुळे त्यांना पुढे जाण्यास वाव मिळाला नाही. म्हणून त्यांनी आम्हाला उच्च शिक्षण घेण्यास सदैव प्रोत्साहन दिले. माझीही तशीच महत्वाकांक्षा होती.
पण १२वीला कमी मार्क्स मिळाल्यामुळे मला इंजिनिअरिंगला जाता आले नाही. म्हणून मी बीसीएसला प्रवेश घेतला. त्यात मी चांगल्या तर्हेने उत्तीर्ण झालो. अगदी लहानपणापासून घरात रेडिओ व इतर उपकरणे पहावयास मिळाल्यामुळे आमच्या मध्ये कुतूहल जागृत झाले. आम्हीही वडिलांप्रमाणे रेडिओ दुरूस्ती करू लागलो. कालांतराने कॉम्प्यूटरचे आगमन झाले. कॉम्प्यूटरमुळे कामगारांनी संप केला. त्यावेळी त्यामधील व्हायरस असल्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली होती. आम्ही त्यावर उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे आम्हाला त्यात थोडे बहुत यश मिळू लागले. आमचा उत्साह अधिकच वाढला. त्यातूनच मी क्विक हील टेक्नॉलॉजीज ही कंपनी स्थापन केली. माझ्यामधील संशोधकाला अधिकच मोठे क्षेत्र मिळाले.
एका बाजूला कॉम्प्यूटर व आयटी क्षेत्रातील येणारे नवनवीन तंत्रज्ञान व दुसर्या बाजूला आमच्यामधील शास्त्रज्ञ यांना प्रोत्साहन मिळू लागले. आजमितीस जगातील ४० देशांमध्ये आमचे ग्राहक आहेत. त्यांच्याकडून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थ्यांनी सतत नाविन्याचा ध्यास घेऊन अभ्यासक्रमातील व अभ्यासक्रमाबाहेरील प्रगतीचा वेध घेऊन आपली व देशाची प्रगती साधावी. शिक्षणसंस्थांनीसुध्दा त्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करावे.
राहुल विश्वनाथ कराड म्हणाले, डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांनी जे सृजनशीलतेची स्वप्ने पाहिली होती. ती सत्यात उतरविण्यासाठी आमच्या विद्यापीठात प्रयत्न केले जात आहेत. उद्योगधंदे आणि शिक्षणसंस्था यांच्यात समन्वय साधून त्यांना लागणारे कुशल मनुष्यबळ तयार केले जात आहे. त्या पध्दतीने आमच्या विद्यापीठात अभ्यासक्रम तयार करून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. विद्यार्थ्यांमधील नवनवीन कल्पनांना प्रोत्साहन देऊन त्यांच्यामध्ये संशोधनवृत्ती जोपासली जात आहे.
प्रा.डॉ. मिलिंद पांडे व डॉ. श्रीहरी होनवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. आर. आर. वरखडे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. मंगेश बेडेकर यांनी आयओटीच्या प्रदर्शनाची माहिती दिली. प्रा.दीपाली जावळे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. बी.एन. जगदाळे यांनी आभार मानले.