आरक्षणासाठी प्रसंगी वाट्टेल ते करणार – हार्दीक पटेल
7 व्या भारतीय छात्र संसदेच्या तिसर्या सत्रात व्यक्त केली भावना
पुणे : “आरक्षणासाठी वाट्टेल ते करण्याची वेळ आली तरी मागे हटणार नाही. भारतातील दलित, आदिवासी व इतर मागासवर्गाच्या आरक्षणाला माझा विरोध नाही. तसेच आर्थिक दुर्बल घटकांना खरेच आरक्षणाची गरज आहे.“ अशी भावना पाटीदार आंदोलनाचे युवा नेते हार्दीक पटेल यांनी व्यक्त केली.
माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट व भारतीय छात्र संसद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सातव्या भारतीय छात्र संसदेच्या तिसर्या सत्रात जात आधारित आरक्षण : सामाजिक न्याय की संपूर्ण अन्याय ? या विषयावर ते बोलत होते.
याप्रसंगी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सिद्धार्थ विनायक पी. काणे, जम्मू काश्मिर विधानसभेचे उपसभापती जहांगीर हुसेन मीर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या महात्मा फुले अध्यासनाचे प्रमुख व विचारवंत हरि नरके, मराठा क्रांती मुक मोर्चाचे संयोजक व आर.आर. पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील, माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, माईर्स एमआयटीचे उपाध्यक्ष व भारतीय छात्र संसदेचे प्रमुख समन्वयक प्रा. राहुल विश्वनाथ कराड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
हार्दीक पटेल म्हणाले, “हल्ली भारतामध्ये ज्याला त्याला देशभक्ती व देशद्रोहाचे प्रमाणपत्र देण्याची फॅशन निघाली आहे. आज भारताला मेक इन इंडिया, डिजीटल इंडियाची गरज नसून मेड इन इंडियाची गरज आहे. महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. मी गांधीच्या अहिंसेचा पुजारी आहे. मात्र जेंव्हा माझ्या आई – बहिणींना घरात घुसुन आमच्यां सोबत चला असे म्हटले जाते, इथल्या युवकांना देशद्रोही ठरवले जाते, तेंव्हा गांधीच्या अहिंसेला बाजुला ठेवून मी भगतसिंगाची क्रांती स्वीकारतो. भारतात जर मंडल कमिशनच्या शिफारशी जर योग्य तर्हेने लागू केल्या तर निश्चितच भारतात सर्व जातींचा विकास होईल.
हरी नरके म्हणाले, “भारत हा जातींचे पालन करणारा देश आहे. आरक्षण हे गरिबी हटवण्याचे काम नसून ते त्या जातींना योग्य प्रतिनिधित्व देण्याचे काम करते. आरक्षण हे फक्त 10 वर्ष राजकीय क्षेत्रासाठी होते तर शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षणाचा कालावधी जोपर्यंत त्या जाती मुख्य प्रवाहात येत नाहीत तोपर्यंत चालू राहणार आहेत. आरक्षणाबद्द्ल बरेच जण प्रसारमाध्यांद्वारे समाजामध्ये गैरसमज पसरवत आहेत. भारताला कॅशलेश नाही तर कास्टलेस सोसायटीची गरज आहे.
डॉ. सिद्धार्थ विनायक काणे म्हणाले, डॉ. आंबेडकरांनी जातीव्यवस्थेचे चटके लहानपणापासूनच सहन केले होते. त्यामुळे राज्यघटनेच्या माध्यमातून त्यांनी वंचितांना आरक्षणाचा हक्क दिला आहे. डॉ. आंबेडकरांनी जातीविरहीत सामाजासाठी आयुष्यभर संघर्ष केला.
जहांगीर हुसेन मीर म्हणाले, भारताला तोडण्यासाठी सारे जग एकवटले आहे. जर सगळे बंधुभावाने राहिले तर भारताची अखंडता कोणीही तोडू शकणार नाही. कोणताही धर्म दुसर्यांचे वाईट चिंतीत नाही. त्यामुळे सर्व धर्मांचा आदर केला पाहिजे.
यावेळी राज्स्थानच्या श्रीमती. सोनादेवी व आसामचे श्री. रुपज्योती कुर्मी यांना आदर्श युवा विधायक पुरस्काराने सन्मानित केले गेले.
राजस्थानच्या श्रीमती. कविता शर्मा- जोशी, बिहारच्या श्रीमती रितु जैस्वाल, पुण्याचे श्री. सुदर्शन चौधरी, हरियाणाच्या नजमा खान, मध्यप्रदेशच्या श्रीमती. भक्ती शर्मा यांना उच्चशिक्षित आदर्श युवा सरपंच पुरस्काराने सन्मानित केले गेले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नीलम शर्मा व प्रा. गौतम बापट यांनी केले.