पुणे, दि.२३ ऑगस्ट: “ आर्थिक मंदी, वाढती लोकसंख्या आणि बेरोजगारी सारख्या ज्वलंत प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारत सरकार योग्य ती पाऊले उचलत आहे. ”असे विचार केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक मंत्री अरविंद सावंत यांनी व्यक्त केले.
इंडस्ट्री अॅकॅडमीया सहयोग समिती आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे आयोजित एक दिवसीय “इंडकॉन” (इंडस्ट्री अॅकॅडमीया कॉन्क्लेव्ह) परिषदेचे उद्घाटन केंद्रीय मंत्री अरिवंद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी ब्लू स्टारचे अध्यक्ष शैलेश हरीभक्ती व न्युट्रॉन इलेक्ट्रॉनिक सिस्टम्स प्रा.लि.चे अध्यक्ष नानिक रूपानी हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ. एस.परशूरामन, प्र कुलगुरू डॉ. श्रीहरी होनवाड, युनिव्हर्सल बिझनेस अँड कॉर्पोरेट सर्व्हीस सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ शहा, स्टारकिंग स्पोर्टस प्रा.लि. एमडी आणि सीईओ प्रविण पाटील आणि विद्यापीठाच्या अभियांत्रिकी शाखेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रसाद खांडेकर हे उपस्थित होते.
अरविंद सावंत म्हणाले,“ स्मार्ट सिटीसाठी पाणी,वीज आणि परिवहनाची योग्य सुविधा प्रत्येकाला मिळायला हवी. त्यासाठी औद्योगिक क्षेत्र आणि शैक्षणिक संस्थेबरोबरच सर्वांनी ही जवाबदारी उचलणे गरजेचे आहे. सर्वांनी मिळून असे कार्य केल्यास अशा शहरांचा विकास होईल.”
“कोणताही देश हा तंत्रज्ञानाच्या विकासाने प्रगती करतो. अशा वेळेस आपल्या देशात लिबरलाइजेशन, प्रायवेटेशन आणि ग्लोबलाइजेशन गरजेचे आहे. परंतू त्यासाठी मानवाला कौशल्याची जोड असणे अत्यंत महत्वाचे आहे. ती गरज फक्त शैक्षणिक संस्थापूर्ण करू शकतात. औद्योगिक क्षेत्रात रोबोटायजेशन आल्याने प्रत्येक कार्य रोबोटच्या मार्फत केल्या जात आहे. प्रगत तंत्रज्ञानामुळे येणार्या काही वर्षात ईलेक्ट्रीक वाहनांचा वापर देशात होईल परंतू त्याही पुढील २० ते २५ वर्षात हायड्रोजनवर वाहने चालतील. त्यामुळे असे म्हणू शकतो की कोणत्याही औद्योगिक क्षेत्राचा कणा हा संशोधन आहे. प्रगती साधतांना बेरोजगारी येईल हा प्रश्न उद्भवतच नाही. बदलत्या तंत्रज्ञानाने प्रमाणे उद्योगधंद्यानी बदलणे गरजेचे आहे. आज इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी मोठी भरारी घेतली आहे.”
प्रगतीबरोबर येथे बँकीक क्षेत्रात डाटा हॅकींगचे प्रमाण ही वाढतच चालले आहे. त्याला काय समजावे हा एक प्रश्न देशासमोर उभा राहतो.”
शैलेश हरीभक्ती म्हणाले,“कोणत्याही कंपनीच्या प्रगतीसाठी संशोधनाची आवश्यकता असते. अशावेळेस सरकारने जनतेच्या हितासाठी वेगवेगळया व चांगली कंपनी पॉलिसी राबवावी. भविष्यात न्यूक्लियर पॉवर व एनर्जीसारख्या क्षेत्रात संधी आहेत. त्यामुळे कंपन्या व शैक्षणिक संस्थांनी काळाची पाऊले ओळखून त्यानुसार संशोधन करावे.”
राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,“ भारतात ४ हजार इंजीनियरिंग कॉलेज आहे. त्यामुळे भारत सरकार ने पुढाकार घेऊन संशोधनावर अधिक भर दयावा. पॉवर आणि स्वातंत्रतेचा अधिकार शिक्षण क्षेत्रातील कार्यरत लोकांना देण्याची गरज आहे. या देशात ज्या पद्धतीने टीस आणि पिलाई सारख्या शैक्षणिक संस्था चमकल्या आहेत, त्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांना मोठ्या प्रमाणात फंडिग मिळाले आहे.”
“ वर्तमान काळात शिक्षण क्षेत्रातील डीएनएची पडताळणी करणे गरजेचे आहे. पुणे येथे जवळपास ५ लाख विद्यार्थी आहेत. परंतू कंपन्यांमध्ये इंटरशिप देण्यास कासाकूस होते. आता ही संस्कृती बदलण्याची गरज आहे. उद्योग व शिक्षण क्षेत्राने पुढील दिशा ठरविण्यासाठी ही परिषद महत्वपूर्ण भूमिका असेल.”
नानीक रूपानी म्हणाले,“ टेलिकम्यूनिकेशन आणि व्हिडियो कॉन्फरन्सी क्षेत्रात आमची कंपनी पायोनियर आहे. वर्तमानकाळात प्रत्येक क्षेत्रात क्रांती घडत आहे. एकीकडे रशिया एवढी प्रगत झाली आहे, की त्यांनी रोबोटच्या हातात बंदूका दिल्या आहेत. भविष्यात आर्टीफिशिल इंटेलिजन्सी हे क्रांतीकारी पाऊल आहे.”
प्रा.डॉ. प्रसाद खांडेकर यांनी प्रास्ताविक केली. तसेच या परिषदेचा उद्देश व भविष्यातील फायदे या संदर्भात माहिती दिली.
परिषदे दरम्यान एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि नामवंत कंपन्या दरम्यान सामजस्य करार झाला.
प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन व आभार मानले