जनता हीच आमची शक्ती आहे- अर्णव गोस्वामी ; भारतीय छात्र संसंदेच्या पहिला सत्रात व्यक्त केले मत
पुणे : “ रिपब्लिक वाहिनी सुरू करताना आम्ही जनतेच्या, विशेष करून युवकांच्या शक्तीवर विश्वास ठेवला आहे. आजपर्यंत आम्ही परकीय वाहिन्या आणि सत्ताधार्यांच्या प्रभावाखाली असलेल्या वाहिन्यांचे राज्य पाहिले. आता ते नाहीसे होईल.” असे मत रिपब्लिक वाहिनीचे संस्थापक व टाईम्स नाऊचे माजी मुख्य संपादक श्री. अर्णव गोस्वामी यांनी व्यक्त केले. अध्यक्षस्थानी पुद्दुचेरी विधानसभेचे सभापती व माजी मुख्यमंत्री श्री. व्ही. वैथिलिंगम हे होते.
माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट व भारतीय छात्र संसद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सातव्या भारतीय छात्र संसदेच्या पहिला सत्रात ‘‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य : अतिरेकाची परिसीमा कोणती?’ या विषयावर ते बोलत होते.
यावेळी अरुणाचल प्रदेश येथील राजीव गांधी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. टामो मिबांग, मराठा आंदोलनाच्या नेत्या व वक्त्या अॅड. स्वाती नखाते, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. विश्वनाथ दा. कराड, माईर्स एमआयटीचे उपाध्यक्ष व भारतीय छात्र संसदेचे प्रमुख समन्वयक राहुल कराड, अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे-पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
हिमाचल प्रदेशच्या कासौली सोलन येथील आमदार डॉ. राजीव सैझल यांना आदर्श युवा आमदार पुरस्काराने गौरविण्यात आले.
श्री. अर्णव गोस्वामी म्हणाले, “ आजकाल पत्रकारांचा धाकच उरलेला नाही. कारण ते आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक रहात नाहीत. समाजामध्ये किती तरी अनिष्ट घटना घडत असतात. पण हे पत्रकार त्यावर ब्र देखील काढत नाहीत. निरर्थक अशा क्षुल्लक गोष्टींवर तासंतास प्रक्षेपण चालू असते. दुर्दैवाने जनतासुद्धा त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करेनाशी झाली आहे. कारण त्यांना प्रेरित करणारे माध्यमच नाही. ”
“ आजपर्यंत अनेक प्रकारची भ्रष्टाचाराची प्रकरणे आम्ही उजेडात आणली. त्याचा पाठपुरावासुद्धा केला. यावेळी आमच्यावर अनेक प्रकारची दडपणे आली. आमचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्याजवळ सत्ता आणि संपत्ती होती पण आमच्या जवळ सत्य होते. जनतेमध्ये त्यांच्याविषयी अनेक प्रकारचा असंतोष खदखदत होता. आम्ही केवळ त्याला वाट करुन दिली. आमच्यासारखे अनेक पत्रकार विविध ठिकाणी काम करीत होते. अखेर आम्ही सर्वजण मिळून एकत्र आलो. रिपब्लिक वाहिनी सुरू केली. ”
“ या पुढचे माध्यमांचे केंद्र हे दिल्ली मुळीच असणार नाही. कारण तेथील पत्रकारिता सर्वात अधिक भ्रष्ट आहे. आता माध्यमांचे विकेंद्रीकरण होईल. कारण त्यातूनच खरी लोकशाही आकार घेणार आहे. विविध राज्यांच्या राजधान्या किंबहुना तेथील काही प्रमुख शहरे माध्यमांची सशक्त केंद्रे बनतील. आमच्या डोळ्यापुढे सध्या मुंबई, पुणे आणि बेंगलोर ही शहरे आहेत. पण भविष्यात निरनिराळ्या ठिकाणी वाहिन्यांची केंद्रे उभी राहतील. ”
श्री. व्ही. वैथिलिंगम म्हणाले, “ अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य हे आपल्याला घटनेनेच दिलेले आहे. पण त्याचबरोबर आपण आपली नागरी कर्तव्ये विसरता कामा नयेत. अर्थात हे स्वातंत्र्य उपभोगताना देशाच्या अखंडतेला बाधा येता कामा नये. तसेच देशाच्या सार्वभौमत्वाला धक्का लागणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. ”
प्रा. टामो मिबांग म्हणाले, “ भारतासारख्या विविधांगी देशाचे सरकार चालविणे ही मोठी अवघड गोष्ट आहे. आपण जर सतत एकाच विभागाची बाजू घेत राहिलो, तर इतरांवर अन्याय होतो. ”
अॅड. स्वाती नखाते म्हणाल्या, “ सध्या स्त्री कोठेही सुरक्षित नाही. कारण सर्वत्र पितृसत्ताक समाजव्यवस्था प्रस्थापित आहे. शिवाय समाजात नीतिमत्तेचा लवलेशही उरलेला नाही. अशावेळी महिला वर्गाच्या बाजूने ठामपणे उभे राहणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. सध्या महाराष्ट्रभर मराठा आंदोलनाचा प्रसार झाला आहे आणि महिलांच्या रक्षणासाठी ही शक्ती सदैव उभी राहिल. ”
याप्रसंगी यावेळी रुतुजा शहा (महाराष्ट्र), राशिद अल्ताफ (जम्मू- काश्मिर), श्रेयस सेनाद (महाराष्ट्र), चंपकलाल जोशी (गुजरात), जेरोन दी सिटर (नेदरलॅन्ड) या विद्यार्थ्यांनी त्यांची मनोगते व्यक्त केली.
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रा. राहुल विश्वनाथ कराड यांनी प्रास्ताविक केले.
श्रीमती नीलम शर्मा व प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डी. पी. आपटे यांनी आभार मानले.