पुणे: ‘अरे संसार, संसार, दोन जीवांचा विचार, देतो सुखाला नकार, आणि दुःखाला होकार’, ‘अरे घडो न घडो’, ‘पहिली माझी ओवी’,अशा विविध गीतांमधून प्रत्येकाच्या संसाराच्या जीवनातील अनेक रूपं रसिकांना टप्याटप्यांवर भेटत गेले.
कवयित्री सौ. उर्मिला विश्वनाथ कराड यांच्या कविता संग्रहावर आधारित “अवघाची संसार” हा संगितमय कार्यक्रम कोथरूड येथील एमआयटी कॅम्पसमधील संत ज्ञानेश्वर सभागृहात पार पडला. कवयित्रीने लिहिलेल्या असे संसार संसार.., अनुभूती, वाटेवरच्या पाऊलखुणा, समीर आणि माझी माय दुधावरची साय.. या कविता संग्रहातील निवडक कवितांचे रसग्रहण करून त्यांना संगीतबध्द स्वरूपात मांडल्या गेले.
या कार्यक्रमाची निर्मिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड यांची आहे. कार्यक्रमात डॉ. माधवी वैद्य आणि डॉ. वृषाली पटवर्धन यांची संहिता आणि दिग्दर्शन असून त्यांनी काव्यवाचन केले. तसेच, संगीतकार राहुल घोरपडे यांनी संगीतबध्द केलेल्या या कार्यक्रमात गायक मीनल पोंक्षे व अमृता कोलटकर यांनी रसिकांवर शब्दसुरांची बरसात केली.
यावेळी नालंदा विद्यापीठाचे कुलपती डॉ.विजय भटकर, प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे पाटील, विश्वराज हॉस्पिटलच्या कार्याकारी संचालिका डॉ. अदिती राहुल कराड, माईर्स एमआयटीचे कार्यकारी संचालक प्रा.डॉ. सुनील कराड, ह.भ.प. गणपत महाराज जगताप आणि राष्ट्रीय कीर्तनकार ज्ञानेश्वर माऊली वाभळे हे उपस्थित होते.
संगीतकार राहुल घोरपडे आणि त्यांच्या सहकार्यांनी ‘दिंडी चालली पंढरीच्या वाटेवरी’ या गीताला स्वरसाज चढवत जणू पंढरपुच्या विठ्ठलाची अनुभूति दिली. त्यानंतर ‘आंब्याचा परस, केळाच’, ‘प्राजक्ताचा सडा अंगणी नकळत पडल्या रातराणी’ सारख्या कवितांना स्वरबध्द करून मांडल्यावर रसिकांना जणू रात्रीचा प्रवासच घडविला.
कवयित्रीने जीवनातील विविध पैलूंना स्पर्श केला आहे. पण खरा आनंद तो अध्यात्मातच असतो. वारकरी संप्रदायाच्या असल्याने कवयित्रीने रचलेल्या ‘दोन तिरावरी आज वारकरी आले, इंद्रायणीच्या तीरावर वारकरी सुखावले’, आणि ‘एकादशीबाई तुझ नाव, केवढ तुझ्या नावाची आवड माझ्या मनाला’ या कवितांना जेव्हा सप्तसुर देण्यात आले तेव्हा जणू पंढरपूरच्या विठोबाची अनुभूती रसिकांना झाली.
संगीतकार राहुल घोरपडे यांनी संगीतबध्द केलेल्या या कार्यक्रमात गायक मीनल पोंक्षे व अमृता कोलटकर यांनी काव्य गायन केल. तसेच, नीलेश श्रीखंडे, मिहीर भडकमकर आणि विनीत तिकोनकर यांनी साथ संगत दिली.
सौ. उर्मिला विश्वनाथ कराड यांनी आपले मनोगत पूर्ण केले.
सूत्रसंचालन डॉ. मिलिंद पांडे यांनी केले. श्री.शालिग्राम खंदारे यांनी आभार मानले.