लातूर,: विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे आणि रामेश्वर (रूई) ग्रामस्थांच्यावतीने ज्येष्ठ कृषीतज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक व दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डिक्की)चे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे यांना तथागत गौतम बुध्द पंचशील विश्वशांती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
हा पुरस्कार प्रदान समारंभ तथागत गौतम बुध्द जयंतीचे औचित्य साधून म्हणजेच शनिवार, दि.१८ मे २०१९ रोजी सकाळी ८.१५ वा. लातूर जिल्ह्यातील रामेश्वर (रूई) या गावातील तथागत भगवान गौतम बुध्द विहार व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विश्वशांती स्मृतिभवन येथे होणार आहे.
या समारंभासाठी लातूर जिल्हा परिषदचे सदस्य सुधाकर श्रृंगारे, जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाचे सभापती प्रा. संजय दोरवे, सुप्रसिद्ध साहित्यिक व लेखक प्रा. रतनलाल सोनग्रा, रिपाईचे चिटणीस चंद्रकांत चिकटे, ज्येष्ठ दलित नेते मोहनलाल माने व ज्येष्ठ समाजसेवक सुनील देशपांडे हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
डॉ. बुधाजीरव मुळीक यांनी भूमाता चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना करून शेतकर्यांची सामाजिक व आर्थिक समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. भारतातील शेती व्यवसाय आणि यांचा उध्दार कसा करावा तसेच शेतकर्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य ते सतत करीत आहेत. बागायती शेतीतून औद्योगिक प्रदूषण कमी करणे व भारतीय फळे इग्लंडसाठी निर्यात सुरू करण्यासाठी त्यांचे मोलाचे योगदान आहे.
डॉ.मिलिंद कांबळे हे आधुनिक भारतातील क्रांतिकारी नेता आहेत. त्यांनी रचानात्मक व सकारात्मक परिवर्तनाची क्रांती घडवून दलितांच्या विचारसरणीत बदल घडविले. दलित चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजची स्थापना करून दलित समाजाला उद्योग आणि व्यवसायात एकत्रित बांधण्याचे कार्य त्यांनी केले आहे. नोकरी मागणारे नको, नोकरी देणारे व्हा हा संदेश त्यांनी या समाजाला दिला. यामुळे प्रत्येक वर्षी हजारो दलित युवक उद्योग व्यवसायात आपले वेगळे स्थान निर्माण करीत आहेत.
अशी माहिती विश्वशांती केंद्र (आळंदी) चे अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड व एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक रमेशअप्पा कराड यांनी दिली.