संत श्री ज्ञानेश्वर महाराज प्रार्थना सभागृह आणि विश्व शांती ग्रंथालयाचा लोकार्पण सोहळा उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते
पुणे : एमआयटी विश्व शांती विद्यापीठ, पुणे आणि एमआयटी आर्ट, डिझाइन अॅण्ड टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर महाराज प्रार्थना सभागृह आणि विश्व शांती ग्रंथालयाचा लोकार्पण सोहळा
याचे औचित्य साधून आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षाचे निमित्ताने मंंगळवार, दि. २ ऑक्टोबर ते शुक्रवार, दि. ५ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत विज्ञान, धर्म आणि तत्त्वज्ञानावर आधारित ‘जागतिक परिषदेचे’ (World Parliament of Science, Religion and Philosophy) आयोजन करण्यात आले आहे. जगातील सर्वात मोठा घुमट असलेल्या ह्या ( Biggest Dome of the World )
संत श्री ज्ञानेश्वर महाराज प्रार्थना सभागृहाचा लोकार्पण सोहळा आणि
जागतिक परिषदेचे उद्घाटन
मंगळवार, दि. २ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.१५ वा. भारताचे उपराष्ट्रपती महामहीम श्री. व्यंकय्या नायडू यांच्या शुभहस्ते होणार आहे. महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल श्री. सी. विद्यासागर राव हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि भारत सरकारच्या निती आयोगाचे उपाध्यक्ष मा. श्री. राजीव कुमारजी हे विशेष सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
त्याचबरोबर, उत्तर प्रदेशचे राज्यपाल महामहीम श्री. राम नाईक, मेघालयाचे राज्यपाल मा श्री. तथागत रॉय, भारताचे गृहमंत्री मा. ना. श्री. राजनाथ सिंग, माजी कृषीमंत्री मा. श्री. शरद पवार, परिवहन मंत्री मा. ना. श्री. नितीन गडकरी, मानवी संसाधन मंत्री मा. ना. श्री. प्रकाश जावडेकर, महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. ना. श्री. विनोद तावडे, बिहारचे पर्यटन मंत्री मा. ना. श्री. प्रमोद कुमार, माजी गृहमंत्री मा. श्री. सुशीलकुमार शिंदे, यांसह अनेक राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे.
भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्त्वज्ञानाचा, विश्वशांती आणि मानवतेचा संदेश देणार्या या भव्य तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर महाराज प्रार्थना सभागृहात, मानवी इतिहासातील अत्यंत महान अशा ज्ञान-विज्ञानाधिष्ठित ५४ संत, शास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ यांच्या भव्य पुतळ्यांचा अंतर्भाव असेलेल्या या प्रार्थना सभागृहाच्या ऐतिहासिक लोकार्पण सोहळ्यासाठी आणि जागतिक परिषदेसाठी जगभरातून अनेक तत्त्वज्ञ, शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ विश्वराजबाग पुणे येथे येत आहेत.
तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या नावांने आयोजित केल्या गेलेल्या या चार दिवसीय वर्ल्ड पार्लमेंटमध्ये संपूर्ण भारत व जगभरातून अत्यंत नामांकित व जगप्रसिद्ध असे शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, विद्वान, धर्मपंडित, शिक्षणतज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते असे सुमारे १२० वक्ते / व्याख्याते आणि ३,००० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
नऊ (९) सत्रात भरविल्या जाणार्या या अभिनव अशा वर्ल्ड पार्लमेंट ऑफ सायन्स, रिलिजन अँड फिलासॉफीमध्ये;
१. संत ज्ञानेश्वर ते डॉ. अल्बर्ट आईन्स्टाईन
२. तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्रांकडे
३. ॐ E = mc2 समीकरणाचे अद्वैत तत्त्वज्ञान
४. धर्मग्रंथ हे खरे जीवनग्रंथ
५. Mind, Matter, Spirit and Consciousness चे खरे स्वरूप
६. सध्याच्या युगात महात्मा गांधींच्या सत्य आणि अहिंसा या तत्त्वांची आवश्यकता
७. विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून मूल्याधिष्ठित ‘वैश्विक शिक्षण पद्धती’ ही काळाची गरज
८. मानव कल्याणासाठी, पर्यावरण सुधार, प्रदूषण नियंत्रण आणि शाश्वत विकासाला प्रोत्साहन देण्याची गरज.
९. प्रत्येक राष्ट्राला ज्याप्रमाणे राष्ट्रगीत असते, त्याचप्रमाणे जात, धर्म, पंथ आणि देशांच्या सीमा ओलांडून, संपूर्ण विश्वाला मानवतेचा आणि विश्वशांतीचा संदेश देणारे माऊलींचे पसायदान हे खर्या अर्थाने ‘विश्वगीत’ म्हणून मान्य केले जावे.
या मानवी कल्याणासाठीच्या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयांवर उपस्थित मान्यवर सखोल चर्चा करून, त्यादृष्टीने पुणे जाहीरनाम्याच्या (PUNE DECLARATION) स्वरूपात ठराव पारित केले जातील.
यापैकी, दि. ४ ऑक्टोबर २०१८ रोजी सायं. ५ वा. ज्ञानतीर्थक्षेत्र आळंदी येथील पवित्र इंद्रायणी तीरावरील विश्वरूप दर्शन मंचावर, ‘तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे’ व ‘पसायदान हे विश्वगीत म्हणून मान्यता मिळावे’ या विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी पवित्र इंद्रायणीमध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील ओव्यांएवढे म्हणजेच ९०३३ ज्ञानदीप मान्यवर, उपस्थित वक्ते, शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ आणि सुमारे ७०० मृदंगवादक, ७०० टाळकर्यांच्या, हजारो भाविकभक्तांच्या व प्रतिनिधींच्या शुभहस्ते, ज्ञानोबा-तुकोबाच्या गजरात अर्पण केले जातील.
या जागतिक परिषदेच्या समारोपाच्या दिवशी – शुक्रवार, दि. ५ ऑक्टोबर २०१८ रोजी दिव्य आशीर्वाद सोहळा (Divine Blessing Ceremony) आणि विज्ञान आणि अध्यात्म यांच्या समन्वयातून जगातील विद्यापीठांमध्ये मूल्याधिष्ठत वैश्विक शिक्षण पद्धतीची प्रस्थापना करणे या विषयावर देशभरातील सुमारे ३०० विद्यापीठांचे कुलगुरू व जागतिक स्तरावरील अनेक शास्त्रज्ञ व शिक्षणतज्ञांची एक भव्य अशी गोलमेज परिषद देखील भरविली जाणार आहे.
या चार दिवस चालणार्या वर्ल्ड पार्लमेंटमध्ये सहभागी होणार्या मान्यवरांमध्ये नोबेल विजेते डॉ. आयन डोयूक, जपान येथील गोई पीस फाऊडेशनचे श्री. हिरू सायोंजी, श्रीमती मासामी सायोंजी, महर्षी विद्यापीठ, अमेरिकेचे डॉ. स्कॉट हेरियट, ऑस्ट्रेलियाचे रसेल डिसोझा, रशियास्थित तत्त्वज्ञ लुबो कोलिकोवा, डायरेक्टर ऑफ चर्चचे प्रमुख डॉ. डॉन क्लार्क, स्वामी चिदानंद सरस्वती, प्रो. कॅरलिन जेन्किन्स, धर्म सिव्हिलायझेशन फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. कल्याण विश्वनाथन, वेस्टमिन्स्टर कॉलेज, अमेरिकेच्या प्रो. जान सईद, जैन धर्मगुरु लोकेश मुनी, गांधीवादी डॉ. एन. राधाकृष्णन, डॉ. रामजी सिंग, प्रसिद्ध उद्योगपती व समाजसेवक डॉ. अरुण फिरोदिया, सॉल्ट लेक विद्यापीठाचे डॉ. रिचर्ड नेल्सन, डॉ. ज्यूड करिव्हॅन, धर्म सिव्हिलायझेशन फाऊंडेशन, अमेरिकेतील श्री. मनोहर शिंदे, फ्रान्स येथील तत्त्वज्ञ प्रो. फ्रान्सिस दस्तूर, थायलंडच्या बोधीसत्व फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. बुद्धचरण दास, डॉ. गुफरान बेग, प्रा. अलेक्स हेंकी, डॉ. रसेल डिसोझा यासारखे अनेक नामांकित विद्वान, तत्त्वज्ञ, शास्त्रज्ञ, धर्मपंडित इ. या पार्लमेंटमध्ये सहभागी होऊन, आपले विचार मांडणार आहेत. सदरील परिषदेचा समारोप समारंभ दि. ५ सप्टेंबर २०१८ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होईल. या समारंभासाठी लोकसभेच्या सभापती मा. श्रीमती सुमित्रा महाजनजी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. समारोपाच्या आधी पुणे जाहीरनाम्याचे वाचन करून उपस्थित प्रतिनिधींकरवी तो पारित केला जाईल.
सध्या आपल्या संपूर्ण जगात विज्ञान व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्व सुखसुविधांसह झालेली पराकोटीची भौतिक प्रगती असूनसुद्धा, दुर्दैवाने दुसरीकडे, हिंसा, रक्तपात, द्वेष, गोंधळ, अराजकता, जातीधर्मातील तेढ, देशांच्या सीमा या सारख्या क्षुल्लक कारणांमुळे अत्यंत संशय, भिती व तणावाचे वातावरण निर्माण झालेले दिसून येते. या पार्श्वभूमीवर, सदरील World Parliament of Science, Religion and Philosophy व्यासपीठावरून संपूर्ण जगाला शांतता आणि मानवी कल्याणाचा संदेश देण्यासाठी जगभरातील धर्मांचे प्रमुख म्हणजेच –
हिंदू धर्माचे धर्मगुरु श्री शंकराचार्य, कॅथलिक पंथाचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस, मक्का आणि मदिनेचे प्रमुख इमाम, बौद्ध धर्माचे प्रमुख परमपूज्य दलाई लामा, जैन धर्माचे प्रमुख साधक डॉ. विरेंद्र हेगडे, श्री. लोकेश मुनी, शीख धर्माचे अमृतसर येथील गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष, तसेच ज्यू, पारशी इ. धर्मांचे धर्मगुरु यांना त्यांच्या त्यांच्या धर्मानुसार आशीर्वाद देण्यासाठी, या दिव्य आशीर्वाद सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
या चार दिवस चालणार्या परिषदेमध्ये भारतभरातील सर्व महाविद्यालयामधील प्राध्यापक व विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.