प्रा. डॉ. विश्वनाथ दा.कराड यांचे मतः एमआयटीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी
पुणे:“ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मागासलेल्या समाजाला हक्क व न्याय मिळवून देण्यासाठी देशात सत्याग्रह केला. मागासलेल्या समाजातील अपृश्यता दूर करण्याचे महान कार्य त्यांनी केले आहे. त्यामुळे त्यांना देशात व जगात विश्वरत्न म्हणून आज ओळखले जातेे.” असे उद्गार एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी काढले.
एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, पुणे व विश्वशांती केंद्र(आळंदी), माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ वी जयंती साजरी करण्यात आली.
या वेळी माईर्स एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे-पाटील, एमआयटीचे प्राचार्य डॉ. एल. के. क्षीरसागर, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलसचिव प्रा. डी. पी. आपटे, माईर्स एमआयटीचे उपकुलसचिव श्री. अभय बिरारी, डॉ.ए.ए. कुलकर्णी, प्रा. सुब्रह्मण्यम, विद्यार्थी जगन्नाथ वणवे, श्रीनिवास चक्रार्या, व भाग्यश्री पगार हे उपस्थित होते.
प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ आपल्या देशात महात्मा गांधी, वि.दा. सावरकर, छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरूषांनी समाजाला दिशा देण्याचे कार्य केले आहे. या महापुरूषांच्या चरित्रांचे व ग्रंथांचे वाचन करुन ते आचरणात आणले, तर समाजात परिवर्तन होऊ शकते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर संघर्ष करुन अपृश्यता दूर करण्याचे काम केले आहे.”
प्रा. शरदचंद्र दराडे-पाटील म्हणाले,“ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची देशात व जगात पूजा केली जात आहे. नुसते फोटो किंवा पुतळे उभारुन चालणार नाही. त्यांनी समाजाला दिलेला विचार आचरणात आणला पाहिजे. खरे म्हणजे पूजा ही विचारांची करावी. जात-पात विसरुन कार्य केल्यास समाजाची उन्नती होईल.”
प्रा. दीपक आपटे म्हणाले,“ घटनेवर श्रद्धा ठेऊन त्याचे पालन करावे. उल्लंघन करु नये. तन, मन व धनाने अभ्यास करावा. तेच खरे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन ठरेल.”
जगन्नाथ वणवे म्हणाला,“ डॉ. बाबासाहेबांचे विचार आचरणात आणल्यास समाजाचा व देशाचा सर्वांगीण विकास होईल. चांगल्या विचारातूनच समाजाची उन्नती होते.”
श्रीनिवास चक्रार्या म्हणाला,“ सर्व मानव जात एक आहे. जर समाजामध्ये एकतेची भावना रूजवली गेली, तर समाज एक संघ होऊ शकतो. तेच काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले आहे. त्यांचा आदर्श आपण तरुण पिढीने घ्यावा.”
भाग्यश्री पगारे म्हणाली,“आपण प्रत्येकजण जाती बद्दल बोलत असतो. पण तो विचार प्रत्येकाच्या मनात कोठे तरी घर करुन बसलेला असतो. जर जात हद्दपार केली तरच संपूर्ण मानव जातीचे कल्याण होईल. प्रत्येकाने मानव हीच जात व मानवता हाच धर्म मानावा.”
या प्रसंगी डॉ. एल. के. क्षीरसागर यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकराबद्दलचे आपले मनोगत व्यक्त केले.
माईर्स एमआयटीच्या विद्यार्थ्यांनी व कर्मचार्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.