देशाच्या समृद्धीसाठी शेती समृद्ध करणे गरजेचे – ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ डॉ.बुधाजीराव मुळीक यांचा सरपंचांना सल्ला
– एमआयटीत संपन्न नवनिर्वाचित परिषदेत १०० पेक्षा अधिक सरपंच
पुणे:“ शेती समृद्ध व महिला सुरक्षित असतील तर देश समृद्ध व सुखी होईल. अर्थात त्यासाठी पर्यावरणपूरक गाव, कचरा निमूर्लन, शुद्ध पाणी व्यवस्था, महिला सुरक्षा, दारूबंदी व अद्ययावत शिक्षण पद्धतीचा वापर ज्या खेड्यात होतो, तेच गाव आणि तीच ग्रामपंचायत खर्या अर्थान आदर्श व परिपूर्ण असे संबोधिले जाऊ शकते. त्याच दृष्टीने सरपंचांना विकासकार्य करावयाचे आहे.” असा सल्ला ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी दिला.
डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, पुणे व जिल्हा परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या नवनिर्वाचित सरपंच परिषद २०१७ (ग्रामीण तादात्म्य कार्यक्रमाचे) च्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी एमआयटी विश्व शांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड हे होते.
यावेळी एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, पुणेचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड, तसेच, पुणे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. यशवंत शितोळे, ग्राम विकास तज्ञ श्री. प्रदीप लोखंडे, पुणे जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संदीप कोहिणकर, ग्राम समृद्धी फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. योगेश पाटील, स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी लि.चे अध्यक्ष श्री. नरेंद्र पवार, अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा कमला सावंत व अतुल कोईराल हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. या परिषदेला १०० पेक्षा अधिक सरपंच उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते उपस्थित सरपंचांचा विशेष सत्कार करण्यात आला.
डॉ.बुधाजीराव मुळीक म्हणाले,“जनतेची नेत्याकडून खूप अपेक्षा असते. त्यामुळे सरपंचाने भरपूर काम करून, प्रत्येक सरकारी योजनांचे चांगल्या मार्गाने पैसे मिळवून त्याचा वापर गाव विकासासाठी करावा. ग्रामपंचायतीत ड्रोनचा वापर वाढवावा. त्यामुळे सरपंचाला गावाची व शेतीची खरी स्थिती समजण्यास वेळ लागणार नाही. शेतकर्यांना त्यांच्या मालाचा योग्य मोबदला हवा असेल तर गावातील गोष्टी गावातच ठेवा. उदा. दूध, भाजी आणि कचरासुद्धा. शहराला याचे मोल कळाले की शेतमालाच योग्य मोबादला आपोआपच मिळेल. आधी शेतकरी असतो, व मग व्यापारी असतो, ही गोष्ट लक्षात ठेवावी. शेतकर्याला आर्थिकदृष्टया समृद्ध होण्यासाठी शेतीपूरक व्यवसायसुद्धा करायला हवेत.”
प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“गांधीजींच्या स्वप्नातील भारत कसा असावा, या संदर्भातील ही सरपंच परिषद आहे. भारतीय अस्मिता जागविण्याचा हा अपूर्व प्रयोग आहे. जातीच्या शापात अडकलेल्या या देशात छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही कुणाची जात विचारली नव्हती. तीच नीती प्रत्येक सरपंचाने आपल्या ग्रामपंचायतीत विकास करताना आचरणात आणावी. देशातील प्रत्येक खेड्याचे वैभव तेथील संस्कृती, प्रेम व आदर यावर टिकून आहे. तिचेे जतन करायला हवे.”
डॉ.एस.एन.पठाण म्हणाले,“ गाव हा जणू विश्वाचा नकाशा आहे. गावावरूनच देशाची स्थिती कळते. त्यामुळे गावाला केंद्रबिंदू मानून विकास साधावा.आजकाल विकासाच्या नावाखाली गाव मात्र भकास झाले आहे. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये संत तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता आधारभूत ठेऊन वाटचाल करावी.”
यशवंत शितोळे म्हणाले,“ग्रामपंचायत ही मूलभूत संस्था असल्यामुळे ती आर्थिकदृष्या प्रबळ कशी ठेवता येईल, यावर सरपंचांनी लक्ष ठेवावे. त्यासाठी अभ्यास गरजेचा आहे. आर्थिकदृष्ट्या परिपूर्ण करण्यासाठी गावात आधुनिक शेती बरोबरच पाणीपट्टी व घरपट्टी आकारली जावी.”
योगेश पाटील म्हणाले,“ नियोजन हेच ग्रामीण क्षेत्राच्या प्रगतीचे सर्वात मोठे सूत्र आहे. सामाजिक जीवनात सर्व गोष्टी सहन केल्यानंतरच विकासाची कास धरता येते. लोकप्रतिनिधीचे सर्वात मोठे प्रेरक छत्रपती शिवाजी महाराज हे असले पाहिजेत.”
प्रा. राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,“ शिक्षणाचा अंतिम उपयोग मानव कल्याणसाठी असतो. त्यामुळे सुशिक्षित विद्यार्थ्यांना खेड्याचे खरे दर्शन कसे घडेल, यासाठी एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या विद्यार्थ्यांना ४ ते ५ दिवस खेड्यात अभ्यासासाठी पाठविण्यात येते.या अभ्यासाचा अहवाल सरपंचाला दिल्यानंतर त्यांनी गावाचा विकास कसा करावा, याची कल्पना येते.”
प्रदीप लोखंडे व नरेंद्र पवार यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले, की, स्वच्छता व बालसंगोपन हे यशाचे गमक आहे. तसेच, शहरातील पैसा ग्रामीण क्षेत्रात कसा आणता येईल या दृष्टीने नवयुवकांनी विचार करावा.
प्रा.डॉ.सुधीर गव्हाणे यांनी नवनिर्वाचित सरपंच परिषदे संदर्भातील माहिती आपल्या प्रस्ताविकात मांडली. प्रा.अतुल कुलकर्णी व प्रा.प्रीती.जोशी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. माधुरी कुलकर्णी यांनी आभार मानले.