नगर-‘अरे आंदोलन कशाला करता, येत्या 15 दिवसात मराठा समाजाला आरक्षण देऊ. त्यामुळे करायचेच असेल तर 1 डिसेंबरला मराठा समाजाने जल्लोष करावा’, असे स्पष्ट विधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले आहे. त्यांच्या या विधानातून मराठा आरक्षणासंदर्भात शुभसंदेश मिळाल्याच्या भावना व्यक्त होत आहेत.
आज शनिशिंगणापूर येथे बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्य मागासवर्ग आयोगाकडून अहवाल सुपूर्द करण्यात आल्यानंतर आपल्या सरकारची भूमिका स्पष्ट केली. ‘अनेक वर्षांपासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे. राज्य मागासवर्ग समितीने आज अहवालही सादर केला आहे. त्यावर पुढील 15 दिवसात निर्णय होईल’, असे मुख्यमंत्री म्हणाले.
नगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर येथील शेतकरी-वारकरी महासंमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. ‘मराठा समाजाला आरक्षण मिळणारच आहे. हे आरक्षण देताना इतर समाजाच्या आरक्षणाला मात्र धक्का लागणार नाही’, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली कर्जमाफी योजना आजही थांबवली नाही. राज्य सरकार 4 वर्षाच्या कालावधीत शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. गेल्या चार वर्षात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 50 हजार कोटी रुपयांची मदत थेट दिली असल्याचा दावा देखील त्यांनी यावेळी केला.
दरम्यान, ‘खऱ्या अर्थाने वारकरी व शेतकऱ्यांनी धर्म आणि संस्कृती जिवंत ठेवण्याचे काम केले आहे. महाराष्ट्राचा धर्म आणि संस्कृती वारकरी संप्रदायाने जिवंत ठेवली आहे’, असेही ते म्हणाले.