पुणे-आरक्षणाच्या मागणीसाठी २० ऑगस्टपासून मराठा कांती मोर्चाने आता बेमुदत चक्री उपोषण आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. राज्यभरातील विविध ठिकाणी २० ऑगस्टपासून चक्री उपोषण करण्यात येणार असून पुणे विभागीय कार्यालया समोर देखील करण्यात येणार असल्याची घोषणा मराठा क्रांती मूक मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या समनव्यक शांताराम कुंजीर,बाळासाहेब अमराळे ,विकास पासलकर यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत घोषणा केली.
यावेळी कुंजीर म्हणाले की,मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ५८ मोर्चे शांततेच्या मार्गात काढून देखील राज्य सरकार ने त्याची दखल घेतली नाही.त्याच्या निषधार्थ ९ ऑगस्ट रोजी राज्यातील ठिकठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात आले.त्या आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यावर चुकीच्या पध्द्तीने गुन्हे दाखल करण्यात आले आहे.ते पोलीसांनी मागे घ्यावे.तसेच मागील महिन्याभरापासून आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक मराठा समाजातील तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत.त्यांच्या कुटूंबातील एका व्यक्तीस शासकीय सेवेत घ्यावे.यासह अनेक मागण्यांसाठी राज्यभरात २० ऑगस्टपासून चक्री उपोषण केले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आम्ही शांततेने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. काही ठिकाणी रास्ता रोको, रेल रोको आणि ठिय्या आंदोलन करण्यात आले. पुण्याच्या बैठकीत तसे ठरलेही होते. पण आंदोलनाला बाह्यशक्तींमुळे गालबोट लागले. आम्ही एक वाजता पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यानंतर राष्ट्रगीत म्हणून आम्ही सर्वांना घरी जाण्यास सांगितले. आम्ही तेथून गेल्यानंतर हा गोंधळ झाला. एका चांगल्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न झाला. आंदोलनामध्ये तोडफोड करणारे समाजकंटक होते, असा आरोप त्यांनी केला.