मुंबई- फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असून मुहूर्त ठरला असल्याची सुत्रांनी माहिती दिली आहे. 14 जूनला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याच्या अनेक दिवसांपासून चर्चा होत्या. पण आता यावर शिक्कामोर्तब झाला आहे. याआधी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असल्याचे सांगितले होते.
दरम्यान आज झालेल्या बैठकीत विस्ताराबाबत चर्चा करण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची आज भेट घेतली. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत सुजय विखेही होते. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार आणि इतर महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिलीये. विखे यांच्यासोबत काँग्रेसमधले त्यांचे काही समर्थक आमदारही भाजपमध्ये येण्याची शक्यता आहे. तसेच राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले आमदार जयदत्त क्षिरसागर यांचेही पु्नर्वसन होणार आहे, त्यामुळे त्यांनाही या मंत्रीमंडळात कोणते स्थान दिले जाते याकडेही सर्वांचे लक्ष लागून आहे. त्यामुळे या सगळ्यांना कसे सामवून घ्यायचे, पुढती रणनीती काय असेल अशा सगळ्या मुद्यांची या बैठकीत चर्चा झाली अशी माहितीही सुत्रांनी दिलीय. या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे विश्वासू आणि संकटमोचक गिरीश महाजन हेही सहभागी झाले होते. दरम्यान, काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार आणि कालिदास कोळंबकर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला मंत्रालयात दाखल झाले आहेत. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली होती. राज्यातील संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलासंदर्भात शहा यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. विधिमंडळ अधिवेशनापूर्वी खातेविस्तार आणि बदल होण्याची शक्यता यावेळी व्यक्त करण्यात आली होती. रावसाहेब दानवे केंद्रात मंत्री झाल्याने नव्या प्रदेशाध्यक्षाचीही नियुक्ती केली जाणार असून त्याबाबतही फडणवीस आणि शहा यांच्या बैठकीत बोलणी झाली.