मुंबई – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच्या सर्व २८८ मतदारसंघांतील उमेदवार निश्चित केले आहेत. प्रत्येक मतदारसंघातून दोन ते तीन संभाव्य उमेदवारांच्या नावांची शिफारस लवकरच काँग्रेसच्या केंद्रीय निवड मंडळाला करण्यात येणार आहे.
प्रदेश काँग्रेसच्या राज्य निवड मंडळात ५४ सदस्य आहेत. मंगळवारी आणि बुधवारी दोन दिवस टिळक भवनात बैठका झाल्या. त्यामध्ये विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई-कोकण अशा विभागवार मतदारसंघातील स्थितीचा आढावा घेण्यात आला. २९ ते ३१ जुलैदरम्यान विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती यापूर्वीच जिल्हावार पार पडल्या होत्या. त्यासाठी राज्यभरातून सुमारे ११०० अर्ज प्राप्त झाले होते. जिल्हा समित्यांनी मुलाखतींचे अहवाल प्रदेश काँग्रेसला पाठवले होते. त्यावर दोन दिवस चर्चा झाली. प्रत्येक मतदारसंघातून दोन ते चार नावे निश्चित करण्यात आली आहेत.
‘आम्ही सध्या तरी राज्यातील सर्व २८८ मतदारसंघांतील संभाव्य उमेदवार निवडले आहेत. मात्र मित्रपक्षांशी आघाडी झाल्यानंतर त्यातील काही मतदारसंघ सोडण्यात येतील,’ असे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
२००९, २०१४ मध्ये असे होते चित्र : २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी यांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या होत्या. काँग्रेसचे ४२ तर राष्ट्रवादीचे ४१ आमदार निवडून आले होते. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने १७४ जागा लढवल्या होत्या. ८२ जागांवर विजय मिळवला. राष्ट्रवादीने ११४ जागा लढवून ६२ जागा मिळवल्या होत्या.
अनेक ठिकाणी पिता-पुत्र उमेदवार इच्छुक
‘प्रत्येक मतदारसंघात ५ ते २० पर्यंत इच्छुकांचे अर्ज आले होते. काँग्रेसला उमेदवारांची चणचण नाही. अनेक ठिकाणी पिता-पुत्र इच्छुकांच्या रांगेत आहेत. यावर केंद्रीय निवड मंडळ अंतिम निर्णय घेईल,’ अशी माहिती विधानसभेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. उमेदवारांच्या निवडीचा घोळ घालण्याबाबत काँग्रेस बदनाम आहे. मात्र या वेळी पहिल्यांदाच काँग्रेसने उमेदवार निवड प्रक्रियेत तरी बाजी मारली असल्याचे चित्र आहे.