पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा लोकसभेची निवडणूक वैयक्तिक टीका टिप्पणी करून व्यक्तिकेंद्री करू पाहत आहेत. मात्र, कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या या व्यक्तीकेन्द्री ‘ट्रॅप’मध्ये न अडकता ही निवडणूक मुद्द्यांवर आणावी असे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
पुणे शहर लोकसभा मतदार संघासाठी कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना,रिपब्लिकन पीपल्स आघाडी व मित्र पक्षांच्या आघाडीचे पुणे शहर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार माजी आमदार मोहन जोशी व बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचे उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आले. त्यानिमित्त आयोजित प्रचारसभेत चावाहन बोलत होते.
माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अजित पवार, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,अ. भा.काँग्रेस कमिटीच्या चिटणीस व महाराष्ट्राच्या सहप्रभारी सोनल पटेल, खासदार सुप्रिया सुळे, मोहन जोशी, खासदार वंदना चव्हाण,आमदार अनंत गाडगीळ, आमदार संग्राम थोपटे, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष चेतन तुपे, कॉंग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय जगताप, जेष्ठ नेते उल्हासदादा पवार, डॉ. विश्वजित कदम, प्रवीण गायकवाड, बाळासाहेब शिवरकर, बापू पठारे, प्रदीप गारटकर, दीप्ती चवधरी, कमल व्यवहारे, मोहनसिंग राजपाल,, अॅड. अभय छाजेड, अरविंद शिंदे, नगरसेवक आबा बागुल, वीरेंद्र किराड, रवींद्र धंगेकर, डॉ.सतीश देसाई,सुषमाताई अंधारे, प्रकाश भालेराव, सचिन खरात, सागर अल्हाट,अमिरभाई शेख, अशोक मासाळ आदी यावेळी उपस्थित होते.
चव्हाण म्हाणाले, पंतप्रधान नरेंद्र मोडी आणि भाजपा लोकसभेची निवडणूक वैयक्तिक टीका टिप्पणी करून व्यक्तिकेंद्री करू पाहत आहेत. परंतु त्यांना उत्तरे देण्याच्या भानगडीत पडू नका तर त्यांना प्रश्न विचारा. भाजपला जाहीरनामा घोषित करता येणार नाही कारण मागच्या जाहीरनाम्यात आश्वासन दिलेली एकाही गोष्टीची पूर्तता त्यांनी केलेली नाही. कॉंग्रेसच्या काळात बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. २० कलमी कार्यक्रम राबविण्यात आला. दारिद्र्य निर्मुलानाकारीता साधने निर्माण करून देण्यात आली. शिक्षणाचा, माहितीचा, असे विविध अधिकाराचे कायदे करण्यात आले. युपीएच्या काळात १४ कोटी लोक दारिद्र्य रेषेच्या वरती आले. यंदाच्या निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात २० टक्के गरीब जनतेला म्हणजे ५ कोटी कुटुंबाला वर्षाला सरसकट ७२,०००/- रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. ते कसे द्यायचे याचे सर्व गणित तयार आहे. देशाच्या सुरक्षेचा विषय महत्वाचा आहे. परंतु पुलवामा, सर्जिकल स्ट्राईक याबाबत प्रश्न विचारायला घाबरू नका. तो आपला अधिकार असल्याचे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत आहे. परंतु राज्यात जनावरांसाठी चाऱ्याची सोय नाही, पाणी नाही, छावण्या नाही याबाबत त्यांना जाब विचारा व निवडणूक मुद्द्यांवर आणा असे ते म्हणाले. २०१४च्या निवडणुकीत भाजपला ३४ टक्के मते पडली होत. ६५ टक्के लोकांनी त्यांच्या विरोधात मतदान केले होते. परंतु आघाडीच्या अंतर्गत मतभेदामुळे भाजप त्यातून सटकून गेला. परंतु यावेळी ते होणार नाही. २३ पक्षांची आघाडी झाली असून आता आपल्या मतांचे विभाजन होणार नाही. त्यामुळे भाजपला १७० पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत आणि मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत असेही त्यांनी सांगितले.
अजित पवार यांनी आपल्या भाषणात भाजप व केंद्र सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले, डॉ. मनमोहन सिंग हे कमी बोलतात अशी टीका त्यावेळी आताचे सत्ताधारी करीत होते. डॉ. मनमोहन सिंग हे कमी बोलत असतील पण ते मुद्द्यांच आणि कामाच बोलत असत. पंतप्रधान मोदी यांनी शेतकरी, तरुणाचा रोजगार, याबाबत पाच वर्षात काय कामे केली ही जनतेसमोर आणा असे आव्हान त्यांनी दिले.
पुणे शहरात पाणी प्रश्न गंभीर होऊन बसला असून त्यावर सत्ताधारी पक्षाकडून कोणत्याही प्रकारचे नियोजन केले जात नाही. शहराला आणि जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारी धरणे कोरडी पडली आहेत.आम्ही सत्तेमध्ये असताना कधीही शहरी आणि ग्रामीण भागाला पाणी कमी पडू दिले नाही. मात्र आताचे सरकार पाण्याचे नियोजन करण्यात अपयशी ठरले आहे.
केंद्रात आणि राज्यात आमची सत्ता असताना. विरोधकांना कधीही वेठीस धरले नाही. पण आताचे सत्ताधारी सत्तेचा गैर वापर करून चौकशी लावण्याची भीती दाखवून आणि संस्था वाचवण्यासाठी आर्थिक आमिषे दाखवून तर काही व्यक्तिना पदे देऊन भाजपात घेतले जात आहे. त्यांच्याकडे गेले आहेत, त्यांच्या बरोबर मी काम केले आहे. त्यांची मला सर्व अंडी पिल्ले माहिती आहेत. जे गेले त्यांनी थोडी कळ काढली पाहिजे होती असेही ते म्हणाले.
२०१४ च्या निवडणुकीत पुण्यातून अनिल शिरोळे यांना पुणेकर नागरिकांनी प्रचंड मतांनी निवडून दिले. त्यांनी पाच वर्षात काय केले याचे प्रगती पुस्तक काढले. मात्र, त्यांच्याच पक्षाने त्यांना नापास केले. त्यांचे तिकीट कापून पालकमंत्र्यांना तिकीट दिले. विद्यमान खासदारांचे तिकीट का कापले याचे उत्तर भाजपने द्यावे असे आव्हान त्यांनी दिले.
मोहन जोशी म्हणाले, पुण्याच्या पालकमंत्र्यांनी पाच वर्षात पुणेकरांची घोर निराशा केली आहे. मी खरा सच्चा पुणेकर असून माझी पुण्याची बांधिलकी आहे. मागच्या खासदारांनी जेवढे काम केले त्यापेक्षा दुप्पट काम करून आपण दाखऊ.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, युपीएचे सरकार सत्तेवर आले तर शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी आम्ही करू. शासनाच्या ज्या योजना आहेत त्या सर्व योजनांची अंबलबजावणी बारामती ताकुक्यात झाली आहे. बारामती तालुका कुपोषणमुक्त केल्याशिवाय राहणार नाही असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी आणि भाजप आम्ही ६० वर्षात काय केले असे विचारतात आता त्यांनी पाच वर्षात काय केले याचा हिशेब द्यावा, आम्ही निर्माण केल्या शिक्षण संस्थांमध्ये आपण शिक्षण घेतले व लिहायला वाचायला शिकले असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. केंद्रातील सरकार हे फेकू सरकार आहे. या सरकारकडे पाच वर्षात काय केले याबाबत बोलण्यासारखे नसल्याने ते वैयक्तिक टीका करत आहेत. परंतु ही निवडणूक पवार कुटुंबाची नाही. ही निवडणूक महागाई, बेरोजगारी, महिलांची सुरक्षा याबाबत विचार करण्याची आहे असे त्यांनी सांगितले.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार अनंत गाडगीळ, दिप्ती चवधरी, कमाल व्यवहारे, अॅड. अभय छाजेड, प्रवीण गायकवाड, अरविंद शिंदे, महेश शिंदे, सुषमाताई अंधारे, प्रदीप गारटकर, अमीरभाई शेख, अशोक मासाळ, सागर आल्हाट, सचिन खरात, प्रकाश भालेराव यांचीही यावेळी भाषणे झाली. पुणे आणि बारामती लोकसभा मतदार संघातील हजारो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.