पुणे-अखेर आज आयुक्त कुणालकुमार बोलले , हो प्रत्यक्ष नाही पण त्यांनी पीआरओ मार्फत आपली सही नसलेले पत्रक प्रसिद्धीस देवून मित्रमंडळ भूखंडाबाबत खुलासा केला आहे . महापालिकेच्या मालकीच्या या भूखंडावर कुंपण बांधल्याप्रकरणी आज जिल्हा न्यायालयाने जमिनीचे मूळ मालक प्राणलाल दोषी यांना नोटीस बजावण्यास सांगून पुढील सुनावणीची तारीख ५ जून अशी ठेवली आहे असे या पत्रकात म्हटले आहे .
मित्रमंडळ चौकातील हा भूखंड ३६हजार ९५८ चौरस मिटरचा असून कमाल जमीन धारणा कायदा १९७६ अनुसार अप्पर जिल्हाधिकारी यांनी तो अतिरिक्त म्हणून घोषित केला होता . सदर जागेच्या कब्जेहक्काची रक्कम त्यावेळी १ लाख ४५ हजार रुपये एवढी महापालिकेकडून जमा करवून घेवून राज्यशासनाने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत या जमिनीचा ताबा महापालिकेस दिला होता .२२ फेब्रुवारी १९७९ रोजी हि ताबेपावती महापालिकेस प्राप्त झाली आणि मिळकत पत्रिकेवर महापालिकेचे नाव मालक म्हणून नोंदविले गेले. याप्रकरणी प्राणलाल यांनी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांच्या न्यायालयात दिवाणी दावा १९१३/१९७९ दाखल केला होता. २६ एप्रिल २०१२ रोजी न्यायालयाने हा दावा फेटाळून लावला आणि महापालिकेचा ताबा मालकी अबाधित ठेवला .तथापी प्राणलाल यांनी या निर्णयाविरुद्ध २१ जून २०१२ रोजी जिल्हा न्यायालयात अपील (४११/२०१२ )दाखल केले .यात जिल्हा न्यायालयाने कानिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या दिवशी असलेली परिस्थिती कायम ठेवण्याचे आदेश दिले.
असे असताना अलीकडे या जागेवर कुंपण घालण्यात आल्याने याबाबत वकिलांचा सल्ला घेण्यात आला. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने संबधित बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देवून याप्रकरणी न्यायालयाकडून आदेश प्राप्त करून घ्यावेत . असा त्यांनी सल्ला दिला .त्यानुसार २६ मे २०१७ रोजी जिल्हा न्यायालयात महापालिकेने शपथ पत्रासह अर्ज दाखल केला . याम्फ्ह्ये अपिलातील वादी प्राणलाल यांनी स्वतः अगर इतरांमार्फात महापालिकेच्या ताब्यास बाधा आणू नये, कुंपण ताबडतोब काढून टाकावे,अथवा कोर्ट कमिशन नेमून वादीच्या खर्चाने कुंपण काढून टाकावे, तसेच वादीच्या अवैध कृतीची दखल घेवून न्यायालयाने दावा फेटाळून लावावा अशी मागणी अर्जातून करण्यात आली . आज त्यावर न्यायालयात सुनावणी झाली . यावेळी न्यायालयाने वाडी प्राणलाल यांना नोटीस बजावण्यास सांगून पुढील सुनावणीची तारीख ५ जून ठेवली आहे . न्यायालयीन आदेशानुसार याप्रकरणी कार्यवाही होत आहे .
असे आयुक्तांनी या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे .