पुणे : -कोंढव्यात बहुमजली इमारतीच्या सोसाटीच्या पार्किंगची संरक्षक भिंत मजुरांच्या झोपडपट्टीवर कोसळल्याची धक्कादायक घटना मध्यरात्रीनंतर घडली आहे. यात पहाटेपर्यंत 15 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. आणखी काही मजूर या ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता आहे. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. शुक्रवारपासून धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे ही घटना घडली आहे. . ही घटना रात्री २ वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
कोंढवा येथील तालाब कंपनीसमोर अल्कोंन स्टायलस सोसायटी आहे. या सोसायटी शेजारीच आणखी एका बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. येथील मजुरांनी अल्कोंन सोसायटीच्या पार्किंग संरक्षक भिंतीला लागून या मजुरांनी झोपड्या बांधल्या होत्या. तेथे हे राहत होते. हे मजूर प. बंगाल आणि बिहारचे असल्याचे समजते. गुरु वारपासून शहरात संततधार पाऊस सुरु आहे. यातच संरक्षक भिंत खचली आणि ती या झोपड्यांवर कोसळली. यात आतापर्यंत तब्बल 15 जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यात २ लहान मुलांचा समावेश आहे. आणखी काहीजण अडकले आहेत. त्याना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक, पोलिस दल आणी पालिकेच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी घट्नास्थळी धाव घेतली. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.मृतांमध्ये बंगाल आणि बिहारमधील मजुरांचा समावेश आहे. तिघांना जिवंत बाहेर काढण्यात आले आहे. २ ते ३ वर्षापूर्वी इमारतीचे बांधकाम करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
मृत जखमींना मदत आणि दोषींना कठोर शासन – जिल्हाधिकारी
कोंढवा बुद्रुक येथे भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेची चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना नियमानुसार शासनाकडून आवश्यक ती मदत केली जाईल, असेही ही त्यांनी सांगितले.दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी राम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व मदत कार्याबाबत आवश्यक त्या सूचना केल्या.कोंढवा येथील दूर्घटनेवरून प्रथमदर्शनी असे लक्षात येते की बांधकाम मजुरांसाठी जी राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती, ती सुरक्षित नव्हती. जिल्हा प्रशासनाकडे या बांधकामविषयक सर्व माहिती उपलब्ध असून त्याची चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कारवाई केली जाईल, असेही जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले.