पुणे-ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासासाठी सक्रिय असलेल्या ‘करिश्मा केअर फाऊंडेशन’ (केसीएफ) या पुणेस्थित स्वयंसेवी संस्थेने मराठवाड्यातील दुष्काळाविरुद्ध लढा देण्याच्या हेतूने ‘गो ग्रीन मराठवाडा’ ही मोहीम सुरु केली असून त्याअंतर्गत गेल्या चार दिवसांत (२१ ते २४ ऑगस्ट) बीडमध्ये ५००० हून अधिक झाडे लावली आहेत. पाऊस कमी पडल्यास गावकऱ्यांनी ठिबक सिंचनाचा वापर करावा, या हेतूने संस्थेने ३००० लिटर्स क्षमतेच्या पाणी साठवण टाक्याही पुरवल्या आहेत.
याआधी संस्थेने २, ३ व ४ ऑगस्ट रोजी वेताळवाडी गावात ३००० झाडे लावली. या वृक्षारोपणात संपूर्ण गाव सहभागी झाले होते. वृक्षारोपणाबाबत मुलांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी, तसेच त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी फाऊंडेशनने मोहिमेत सहभागी झालेल्या मुलांना शाळेत वापरण्याचे नवे बूट दिले.
‘गो ग्रीन मराठवाडा’ या मोहिमेचे उद्घाटन गेल्या ५ जूनला जागतिक पर्यावरण दिनी बीड जिल्ह्यातील नागथाळा गावी केले. या उपक्रमांतर्गत ५०००० झाडे लावण्याचे उद्दिष्ट्य समोर ठेवण्यात आले आहे. ‘करिश्मा केअर फाऊंडेशन’ने आजअखेर टाकळीसिंघ, वेताळवाडी व नागथाळा या तीन गावांत मिळून ८००० झाडे लावली आहेत.
हा उदात्त उपक्रम ‘केसीएफ’च्या संस्थापक नीलम तुतेजा यांच्या संकल्पनेतून साकारला असून श्री. अबिद व अन्य सहकाऱ्यांचा संघ, संबंधित गावांतील युवक, शेतकरी, विद्यार्थी व शिक्षक असे सर्व या भागातील दुष्काळ व गरीबीचे निर्मूलन करण्यासाठी समर्पित व ध्येयवादी वृत्तीने वृक्षारोपणाचे काम करत आहेत.
यासंदर्भात बोलताना नीलम तुतेजा म्हणाल्या, की संपूर्ण गावाने वृक्षारोपण कामात सहभागी व्हावे, असे मला वाटते, जेणेकरुन त्यांना झाडे तोडण्यापेक्षा झाडे लावण्याचे महत्त्व जाणवेल. वृक्षतोड हे हिरवाई नष्ट होण्याचे व दुष्काळाचे कारण आहे. संपूर्ण वेताळवाडीतील शेतकऱ्यांनी झाडे लावण्यासाठी पुढाकार घ्यावा, या हेतूने आम्ही त्यांना खतेही दिली आहेत.