पुणे : “महाराष्ट्रात दरवर्षी एक लाख 90 हजार क्षयरोगाच्या रुग्णांची नोंद होते. त्यामध्ये शासकीय रुग्णालयांत एक लाख 30 हजार, तर खासगी रुग्णालयांत 60 हजार रुग्णांची नोंद होते. राष्ट्रीय धोरणात्मक योजनेच्या माध्यमातून (एनएसपी) शासनातर्फे 2025 पर्यंत क्षयरोग निर्मुलनासाठी क्रांतीकारी उपाययोजना राबविण्यात येणार असून, त्यासाठी रुग्णकेंद्री दृष्टिकोन ठेवून मदत यंत्रणा (सपोर्ट सिस्टम) तयार करण्यात आली आहे. ज्यामुळे रुग्णांवर नियमित उपचार आणि खर्च कमी होण्यास मदत होईल,” अशी माहिती राज्य आरोग्य विभागाच्या (टीबी) सहसंचालक डॉ. पद्मजा जोगेवार यांनी दिली.
राज्य क्षयरोग कार्यालय आणि ग्लोबल हेल्थ स्ट्रॅटेजिज यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांसाठी आयोजित कार्यशाळेत डॉ. पद्मजा जोगेवार बोलत होत्या. नवी पेठेतील पत्रकारभवन येथे झालेल्या या कार्यशाळेत त्यांनी ‘क्षयरोग निर्मुलनासाठी राष्ट्रीय धोरणात्मक नियोजन : महाराष्ट्रातील सद्यस्थिती आणि उपक्रम’ या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमधील प्राध्यापक डॉ. तुषार सहस्त्रबुद्धे, ग्लोबल हेल्थ स्ट्रॅटेजिजच्या दिव्या वैद्यनाथन आदी उपस्थित होते.
डॉ. पद्मजा जोगेवार म्हणाल्या, “भारतातील अनेक राज्यांनी क्षयरोग रुग्णांच्या मदतीसाठी अनेक उपक्रम सुरु केले आहेत. या रुग्णांना पोषक अन्न पुरवणे, रुग्णांचा पाठपुरावा व समुपदेशन, अन्य योजनांशी जोडून घेणे, रोख रकमेचे हस्तांतरण आणि प्रचार समूह तयार करणे आदी गोष्टींचा समावेश आहे. मानसिक व सामाजिक समस्यांचे व्यवस्थापन हेदेखील यामध्ये महत्वाचे आहे. शासकीय पातळीवर गावांगावांतून क्षयरोगाविषयी जागृती अभियान राबवले जात असून, त्यासाठी रुग्णांनी संकोच न बाळगता योग्य उपचार घ्यावेत. दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ खोकला येत असेल, तर त्वरीत शासकीय अथवा खासगी दवाखान्यात जावून तपासणी करावी. यामध्ये आता अलिकडच्या काळात खासगी क्षेत्रातील तज्ज्ञांना जोडून घेतले जात आहे.”
डॉ. तुषार सहस्त्रबुद्धे म्हणाले, “क्षयरोगाचे अनेक प्रकार आहेत. त्यामुळे खासगी डॉक्टरांनाही त्याच्या नोंदी करताना संपूर्ण माहिती नसते. परिणामी, क्षयरोग असलेल्या रुग्णांवर उपचार करताना अडचणी येतात. क्षयरोगासाठी आवश्यक उपचार दिले जात नाहीत. त्यामुळे खासगी डॉक्टरांमध्येही टीबीसाठी जागृती असणे आवश्यक आहे. खासगी डॉक्टरांकडे येणार्या रुग्णांची माहिती शासनाकडे पाठवणे आवश्यक आहे. लोक रस्त्यांवर थुंकतात. परंतु, त्यातील बॅ़क्टेरिया मरत नाहीत. एकूण टीबीच्या रुग्णांपैकी 6.19 टक्के रुग्ण एमडीआर प्रकारातील आहेत. योग्य काळजी आणि उपचार घेतल्यास क्षयरोगावर नियंत्रण मिळवता येईल.”
प्रास्ताविक दिव्या वैद्यनाथन यांनी केले. अंगोना पॉल यांनी आभार मानले.