पुणे : “युवापिढी देशाचे भवितव्य असते. या पिढीला घडविण्यासाठी त्यांच्यावर शालेय वयातच चांगले संस्कार होणे गरजेचे आहे. त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात चांगले नाते असायला हवे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडवताना वात्सल्य, प्रेमभाव जपणे महत्वाचे आहे,” असे प्रतिपादन सिस्टर मबिलिया ए. सी. यांनी केले. मुलींच्या शिक्षणासाठी कार्यरत असलेल्या लुल्लानगर येथील माउंट कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कुलच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमावेळी सिस्टर मबिलिया बोलत होत्या.
प्रसंगी बिशप थॉमस डाबरे, शिक्षणाधिकारी डॉ. गणपत मोरे, माजी महापौर प्रशांत जगताप, हायस्कुलच्या प्राचार्या सिस्टर मरिसा ए. सी. यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले. त्यामध्ये शाळेतील जवळपास १३०० विद्यार्थिनींनी नृत्य, नाटक, गायन आदी कार्यक्रम सादर केले. अॅपोस्टॅलिक कार्मेलमधील सिस्टर्सचा समूह यासाठी स्वयंप्रेरणेने आणि नि:स्वार्थी भावाने प्रयत्न करीत आहे. अल्पसंख्याक ख्रिस्ती समाजातील मुलींची ही शाळा आहे. प्रामुख्याने इंग्रजी माध्यमातून येथे शिक्षण दिले जाते. इतर समाजातील मुलींनाही त्यांच्या धार्मिक भावना आणि वैचारिक भूमिकेचा आदर ठेवून प्रवेश दिला जातो. मुलींच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यासाठी त्यांच्यात सामाजिक जाणीव रुजवण्यात संस्थेचे योगदान उल्लेखनीय आहे.
सिस्टर मबिलिया म्हणाल्या, “माउंट कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कुलने स्थापनेपासूनच विद्यार्थ्यांतील माणूस घडविण्याची परंपरा जपली आहे. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय अभ्यासाबरोबरच त्यांना प्रेम, वात्सल्य, आदरभाव शिकवला पाहिजे. राष्ट्रभक्तीची भावना त्यांच्यात रुजवायला हवी. मूल्याधिष्ठित शिक्षण देऊन मुलांना आनंददायी, निरोगी जीवन जगण्यासाठी प्रेरित करणे शिक्षकाचे कर्तव्य आहे. ईश्वरी संदेशाला समोर ठेवून नि:स्वार्थीपणे सर्वच सिस्टर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी काम करीत आहेत, ही संस्थेच्या दृष्टीने अतिशय अभिमानाची गोष्ट आहे.”
बिशप थॉमस डाबरे म्हणाले, “मानवतावादी शिक्षण देण्याचा आपण सर्वानी प्रयत्न करावा. कोणत्याही शाळेच्या यशस्वी वाटचालीत पालकांचे योगदान मोलाचे असते. धार्मिक आणि नैतिक मूल्याची जोपासना व्हावी. गुरु-शिष्याचे नाते दृढ असेल, तर विद्यार्थी चांगला नागरिक आणि चांगल्या समाजाची निर्मिती होईल.”
सिस्टर मरीसा म्हणाल्या, “मदर व्हेरोनिका यांनी मुलींच्या शिक्षणासाठी स्थापलेल्या या संस्थेचे काम पुढे नेताना आनंद वाटतो. सर्व ठिकाणी कुटुंबवत्सल भावना, टीम स्पिरिटने काम करणारी पिढी तयार करण्यासाठी माझा प्रयत्त्न असतो. समाज हितासाठी काम करणारे जबाबदार नागरिक घडविण्याचे ध्येय संस्थेचे असून, ते पुढे नेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”