पुणे : “मधुमेहासारख्या आजाराने संपूर्ण जग त्रस्त आहे. आयुर्वेदातील उपचारपद्धती जगाला मधुमेहासारख्या आजारांपासून मुक्त करण्यासाठी उपयुक्त आहेत. त्यामुळे अधिकाधिक देशांनी, लोकांनी आयुर्वेदाला आपलेसे केले पाहिजे. त्यासाठी आयुर्वेद जागतिक स्तरावर पोहोचण्याची गरज आहे,” असे मत आयुर्वेदाचार्य व केशायुर्वेदाचे संस्थापक डॉ. हरीश पाटणकर यांनी व्यक्त केले.
जागतिक स्तरावर आयुर्वेदाचा प्रसार-प्रचार व्हावा, यासाठी नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विज्ञापीठ (एमयुएचएस), नेदरलँड येथील प्रेमदानी आयुर्वेदा महाविद्यालय आणि नेदरलँडमधील भारतीय दूतावास यांच्या संयुक्त विद्यमाने नेदरलँड येथे आयोजित दोन दिवसीय तिसऱ्या आंतराष्ट्रीय आयुर्वेद परिषदेत डॉ. पाटणकर बोलत होते. यावेळी डॉ. पाटणकर व डॉ. गायत्री पांडव यांना ‘इंडो-डच आयुर्वेद आयकॉन २०१९’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रेमदानी आयुर्वेदा महाविद्यालय आणि गांधी सेंटर (इंडियन नेदरलँड्सच्या एम्बेसीची सांस्कृतिक शाखा), डेनहॅग नेदरलँड येथे भरविण्यात आलेल्या परिषदेचे उद्धाटन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, महर्षी आयुर्वेद हॉलंडचे गिरीशजी मोमाया, प्रेमदानी आयुर्वेद महाविद्यालयाचे डॉ. एटियन प्रेमदानी, नेदरलँड येथील भारतीय दूतावसाच्या डॉ. निर्मला शर्मा, डॉ. मिलिंद जानी, व्यंकट जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी आयुर्वेद स्मरणिकेचे प्रकाशनही झाले.
या परिषदेत आयुर्वेदासंबंधी आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि प्रेमदानी आयुर्वेद महाविद्यालयात शैक्षणिक करार झाला. याअंतर्गत दोन्ही देशांमध्ये विद्यार्थी, प्राध्यापक, तज्ज्ञ मार्गदर्शकांचे आदान-प्रदान, प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबविले जाणार आहे, असे डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले. डॉ. चव्हाण म्हणाले, “आयुर्वेदाला जागतिक स्तरावर कायदेशीर मान्यता मिळण्यात अनेकदा अडचणी येतात. त्यामुळे विद्यापीठांच्यामार्फत आयुर्वेदाचा प्रसार होणे ही काळाची गरज आहे. संबंधित देशातील विद्यापीठांच्या माध्यमातून आदानप्रदान झाल्यास आयुर्वेदाला जागतिक मान्यता मिळण्यास मदत होईल.”
डॉ. निर्मला शर्मा यांनी आयुर्वेदाचा इतिहास, पूर्वापारपासून वेगवेगळया देशातील विद्यापीठात आयुर्वेदात होत असलेले काम याबद्दल माहिती दिली. आयुर्वेदाची भारतातील नालंदा, तक्षशीलापासून चालत आलेली परंपरा संगितली. भारतातील आयुर्वेद विद्यापीठाच्या माध्यमातून जगभरातील विविध आयुर्वेद विद्यापीठात सुरु असलेले ज्ञानप्रसाराच्या कार्याविषयीही माहिती दिली.
या परिषदेत विविध देशांतून आलेल्या आयुर्वेद तज्ज्ञांनी आपले प्रबंध सादर करीत विचार मांडले. नेदरलँड येथे आयुर्वेदाचा प्रसार, आयुर्वेदामधील आहारशास्त्र उपचार पद्धती, नेत्ररोग, मधुमेह यासारख्या आजारावरील उपचार, आयुर्वेदातील सौंदर्यप्रसादन साधने, मूळव्याधसारख्या आजारावर उपचार, स्वयं रोगप्रतिकारक व्याधी आणि आयुर्वेद, श्वसन रोग आयुर्वेद उपचार पद्धतीची व्याप्ती, आयुर्वेदासमोरील जागतिक आव्हाने आदी विषयांवर व्याख्याने झाली.
‘केशायुर्वेद’च्या सदस्या डॉ. स्नेहल पाटणकर, डॉ. गायत्री पांडव, किशोर पांडव यांच्यासह वैद्य वैभव मेहता, वैद्य कुणाल कामठे यांनी त्यांचे प्रबंध सादर केले. वैद्य रश्मी वेद यांनी आयुर्वेदीय सौंदर्यप्रसाधन निर्मिती व महत्व कार्यशाळेच्या रुपात मांडले. नागपूरचे डॉ. तपस निखारे, जयपूरचे डॉ शरद पोर्टे, रायपूरचे डॉ. के. बी. श्रीनिवास राव, मुंबईचे डॉ. प्रियांका ठिगळे-रिसबुड शोधनिबंध सादर केले.