पुणे : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना कोथरूड मतदारसंघातून दिलेल्या उमेदवारीचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आरपीआय) ब्राह्मण आघाडीतर्फे स्वागत करण्यात आले आहे. जातीधर्माच्या पलीकडे जाऊन आपण विकासाचा विचार केला पाहिजे. भाजपने चंद्रकांत पाटील यांना काहीतरी विचाराअंतीच उमेदवारी दिली असणार आहे. त्यामुळे महायुतीचा घटक पक्ष आणि ब्राह्मण समाज म्हणून आपण पाटील यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, असे आरपीआय ब्राह्मण आघाडीचे अध्यक्ष ऍड. मंदार जोशी यांनी म्हटले आहे.
विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी आणि स्थायी समिती अध्यक्ष मुरली मोहोळ व महायुतीच्या सर्व पदाधिकारी यांनी केलेल्या कामामुळे भाजपा केंद्रीय समितीने केलेल्या सर्व्हेमध्ये कोथरूड मतदारसंघ ‘सेफझोन’मध्ये असल्याने चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीसाठी विचार केला आहे. ही गोष्ट पुण्याच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे. मात्र, काही लोक या गोष्टीला विनाकारण जातीय रंग देण्याचा प्रयत्न करीत आहेत. वास्तविक असा कोणताही प्रकार अस्तित्वात नाही आणि कोणी सवंग प्रसिद्धीसाठी असे प्रकार करू नयेत. ते खपवून घेतले जाणार नाहीत.
तसेच चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी मिळाल्यामुळे ते कोथरूड मतदार संघातील सर्व इच्छुक उमेदवारांना योग्य न्याय देतील.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि ‘आरपीआय’चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले जो आदेश देतील त्याप्रमाणे ‘आरपीआय’च्या सर्व आघाड्या आदेश पाळून महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करतील, असा विश्वासही ऍड. जोशी यांनी व्यक्त केला.