सर्वधर्मियांनी दिला अहिंसा, शाकाहाराचा नारा
रांची ते श्री सम्मेद शिखर ‘अहिंसा यात्रा’; डॉ. कल्याण गंगवाल यांचा विशेष सन्मान
पुणे : अहिंसा, शाकाहार आणि व्यसनमुक्तीबाबत जनजगृती करण्यासाठी झारखंडची राजधानी रांची ते श्री शिखर सम्मेद (पारसनाथ) या अहिंसा यात्रेला सर्वधर्मियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हजारो नागरिकांनी रस्त्यांवरून चालत अहिंसा, शाकाहाराचा नारा दिला. १७ ते २२ सप्टेंबर या कालावधीत ही यात्रा निघालेल्या या अहिंसा यात्रेचे नेतृत्व पुण्यातील सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. कल्याण गंगवाल व छत्तीसगडच्या पवन जैन यांनी केले. जीवदया, शाकाहार, नशाबंदी, गो-संरक्षण, पर्यावरण रक्षणासाठी समाजात जागृती करण्याच्या उद्देशाने ही यात्रा निघाली.
या यात्रेदरम्यान, जीवदया, शाकाहार, अहिंसा आणि व्यसनमुक्तीसाठी गेली ४० वर्षे कार्यरत असलेल्या डॉ. कल्याण गंगवाल यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना ‘अहिंसा राष्ट्रगौरव पुरस्कार’ आणि ‘पार्श्वरत्न पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. दोन्ही पुरस्काराची रक्कम डॉ. गंगवाल यांनी येथील आदिवासी समाजाच्या विकासासाठी परत केली. हा सोहळा धुबन पारसनाथ येथील गुणायतनच्या परिसरात झाला. यावेळी अखिल भारतीय श्री दिगंबर महासमितीचे अध्यक्ष मणिंद्र जैन, तीर्थरक्षा कमिटीचे कार्याध्यक्ष राजेंद्र गोधा, पारसनाथ इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे पदाधिकारी व शिखर संस्कारचे अध्यक्ष एम. पी. अजमेरा, मुंबईचे उद्योगपती प्रभात जैन, कोटा राजस्थानचे उद्योगपती नेमाकाका उपस्थित होते. या कार्यक्रमाला मुनिश्री प. पू. १०८ कुंथूसागरजी महाराज, सिद्धांतसागरजी यांचे मंगल सानिध्य लाभले. गुणायतन परिसरात झालेल्या कार्यक्रमात राज्याचे पर्यटन, सांस्कृतिक व क्रीडामंत्री अमर बाऊरी यांच्या हस्ते ‘अहिंसा राष्ट्रगौरव पुरस्कार’ आणि ‘पार्श्वरत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. यावेळी मंत्री बाऊरी यांनी डॉ. कल्याण गंगवाल यांनी केलेल्या प्रबोधनानंतर आजन्म शाकाहारी व व्यसनमुक्त राहण्याचा संकल्प घेतला. त्याचबरोबर श्री सम्मेद शिखरला अहिंसा क्षेत्र घोषित करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
या यात्रेमध्ये हजारो लोकांनी सहभाग घेतला. महिला, पुरुष, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय होता. गाणी, पथनाट्य, भजन आदींच्या माध्यमातून जागृती करण्यात आली. झारखंडमधील सामाजिक संस्था, राजकीय नेते व कर्यकर्तेही यामध्ये सहभागी झाले होते. या अहिंसा यात्रेला संत शिरोमणी आचार्य १०८ विद्यासागरजी महामुनीराज व प्रखर वक्ता प. पू. १०८ मुनी प्रमाणसागरजी यांचे आशीर्वचन लाभले होते.