पुणे : “काही वर्षांपूर्वी आगपाखड करणार्या लोकांना आज भारतीय जनता पक्षाचे नेते मिठ्या मारत आहेत. सक्षम विरोधक हे सदृढ लोकशाहीचे लक्षण आहे. मात्र, विरोधक संपवून लोकशाही खिळखिळी करण्याचा भाजपचा डाव आहे. सध्या भाजपत सुरु असलेले इनकमिंग त्याचेच प्रतिक आहे. आज भाजप नावाची गंगा उगम पावली असून, भ्रष्टाचाराचे पाप केलेले अनेकजण भाजपनामक गंगेत डुबकी मारून पवित्र होत आहेत,” अशा शब्दांत सामाजिक कार्यकर्त्या आणि गणराज्य संघाच्या अध्यक्षा सुषमा अंधारे यांनी भाजपवर शरसंधान साधले. लोकशाहीचे महत्त्व अबाधित ठेवण्यासाठी भाजपविरोधी आवाज बुलंद करुन विरोधकांनी एकत्र येऊन प्रामाणिक प्रयत्न करायला हवेत, असेही अंधारे यांनी सांगितले.
भीम आर्मीतर्फे (बहुजन एकता मिशन, महाराष्ट्र) आयोजित ‘संविधानविरोधी सरकार… चले जाव महापरिषदेत’ सुषमा अंधारे बोलत होत्या. स्वारगेटजवळील गणेश कला क्रीडामंच येथे झालेल्या या महापरिषदेला जेष्ठ विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. कुमार सप्तर्षी, दिल्ली येथील मुस्लिम विचारवंत वली रहमानी, आंबेडकरी विचारवंत कुमार मेटांगे, संयोजक भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष दत्ता पोळ, महिला आघाडीच्या नीता आडसुळे, उपाध्यक्ष हुसेनभाई शेख, मुकेश गायकवाड, संपर्कप्रमुख प्रदीप कांबळे आदी उपस्थित होते. यावेळी प्रतीकात्मक बॅलेटपेपरवर मतदान करून ईव्हीएमचा निषेध करण्यात आला. तसेच भीम आर्मीच्या संकेतस्थळाचे लोकार्पण करण्यात आले
सुषमा अंधारे म्हणाल्या, “भारतीय म्हणून आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. समानतेच्या पातळीवर आणणारी आंबेडकरी चळवळ बळकट व्हावी. आज मोदी-शहांची जोडगोळी आणि फडणवीस सरकार जनतेची फसवणूक करीत आहे. परिवर्तनाचा मार्ग मतदानाचा अधिकार आहे. मात्र, बॅलेट पेपर दूर करुन ईव्हीएमच्या घोळात निवडणुका होत आहेत. ईव्हीएम विरोधी मोहिमेत पक्षीय भूमिका येता कामा नये. सगळे एकत्र आले, मतांचे विभाजन थांबवले, तरच या संविधान विरोधी भाजप सरकारला चले जाव म्हणता येईल. त्यासाठी भावनिकतेपेक्षा वास्तव समजून घेण्याची गरज आहे. व्यक्ती, संस्था यापेक्षाही विचारधारेला अधिक प्राधान्य दिले पाहिजे.
डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले, “आज मुस्लिम जात्यात, तर हिंदू सुपात आहेत. हिंदुत्ववादी मनुवादी राज्य आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. लोकशाहीमध्ये जात, धर्म आणता कामा नये. आज बिगरमुस्लिम म्हणजे हिंदू अशी व्याख्या सांगितली जात आहे. भारतीय नागरिक म्हणून आपण लोकशाही विरोधी हिंदुत्ववाद्यांचा डाव उधळून लावण्यासाठी आपण एकत्र आले पाहिजे.”
अली रहेमानी म्हणाले, “संविधान नसते तर आपण आजच्यासारखे जगू शकलो नसतो. संविधान बदलू पाहणारे टोकाचे पाऊल उचलू शकतात. हिंदू-मुस्लिम आणि इतर धर्मात फूट पाडण्याचा कट हिंदुत्ववादी करत आहेत. मुस्लिमांच्या भारतीयत्वार प्रश्न उपस्थित करणे चुकीचे आहे. ‘मॉब्लिंचिंग’ ही तर राजकीय हत्या असून, त्यासाठी दलितांचा, मुस्लिमांचा वापर केला जात आहे.”
कुमार मेटांगे म्हणाले, “संविधान बदलण्याची भाषा करणारे जबाबदार व्यक्ती म्हणवणारे देशद्रोही आहेत. टप्प्याटप्प्याने संविधान कमकुवत करण्याचा डाव आपल्याला हाणून पाडण्यासाठी आपण जागृत राहिले पाहिजे.” दत्ता पोळ यांनी प्रास्ताविकात महापरिषदेच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. दीपक म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले. जैलाबभाई शेख यांनी आभार मानले.
महापरिषदेत यावर विचारमंथन
ईव्हीएम हटाव, संविधान बचाव, झुंडशाही, मुस्लिम युवकांच्या हत्या, वाढते दलित अत्याचार, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर होणारे हल्ले, सांगली-कोल्हापूर पूरपरिस्थितीबाबत बेजबाबदार असलेले सरकार, घटनात्मक संस्थांचा होणार गैरवापर, खासगी क्षेत्रातील आरक्षणाचा प्रश्न, शेतकरी आत्महत्या आणि कर्जमाफी, झोपडपट्टी धारकांची होणारी फसवणूक यासह भीमा कोरेगाव हल्ला अशा विविध मुद्यांवर या महापरिषदेत विचारमंथन झाले.