तंत्रशिक्षण संचालनालय, केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूटतर्फे औद्योगिक-शैक्षणिक संस्था समन्वय परिषदेचे आयोजन
पुणे : तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य आणि येवलेवाडी येथील केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय औद्योगिक-शैक्षणिक संस्था समन्वय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या रविवारी (दि. ११) व सोमवारी (दि. १२) या दोन दिवशी ही समन्वय परिषद बापदेव घाटाच्या पायथ्याशी असलेल्या केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या कॅम्पसमध्ये होणार असून, त्याचे उद्घाटन रविवारी सकाळी १०.३० वाजता राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे व तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक सी. टी. कुंजीर व केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष कल्याण जाधव यांनी पत्रकार परिषदेत शुक्रवारी दिली. यावेळी केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. हेमंत अभ्यंकर, प्राचार्य डॉ. सुहास खोत, प्रा. प्रकाश वाणी, डॉ. सी. एम. सेवतकर आदी उपस्थित होते.
सी. टी. कुंजीर म्हणाले, “देशाच्या विकासासाठी औद्योगिक-शैक्षणिक संस्था समन्वय अतिशय महत्वाचा असून, तंत्रशिक्षणामध्ये आपण प्रगती करीत आहोत. दर्जेदार आणि प्रात्यक्षिक शिक्षण देण्यासाठी या गोष्टी होणे महत्वाचे असून, त्याच दृष्टिकोनातून ही दोन दिवसीय परिषद आयोजिली आहे. नवकल्पना, उद्योजकता विकास, कौशल्याधारित शिक्षण आदी बाबींवर या परिषदेत चर्चा होणार आहे. बीजभाषण, चर्चासत्र आणि प्रकल्पांचे प्रदर्शन असणार आहे. डॉ. संजय इनामदार यांचे इनोव्हेशन इन इंडस्ट्री विषयावर बीजभाषण होणार आहे. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चरचे अध्यक्ष डॉ. प्रदीप भार्गव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, हुबळी येथील डॉ. नितीन कुलकर्णी उद्योजकता विकास यावर मार्गदर्शन करणार आहेत.”
कल्याण जाधव म्हणाले, “परिषदेच्या दुसऱ्या दिवशी डॉ. संदीप इनामदार ‘इंडस्ट्री बेस्ड प्रोजेक्ट्स’ यावर, तर आनंद जोशी ‘रिव्हर्स इंजिनिअरिंग’ यावर मार्गदर्शन करणार आहेत. परिषदेचा समारोप महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण महामंडळाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. या परिषदेत चार चर्चासत्रे होणार असून, त्यामध्ये औद्योगिक व शैक्षणिक संस्थांमधील तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. याशिवाय, विद्यार्थ्यांनी तयार केलेले काही नाविन्यपूर्ण प्रकल्प प्रदर्शित केले जाणार आहेत.”
डॉ. हेमंत अभ्यंकर म्हणाले, “अभियांत्रिकी महाविद्यालये आणि उद्योगांनी एकत्रित येऊन काम केले, तर दोघांनाही फायद्याचे आहे. त्यातून शिक्षणसंस्था चांगल्या पद्धतीने कौशल्य प्रशिक्षण देऊन उच्च प्रतीचे मनुष्यबळ उद्योगांना पुरवतील. शिक्षण संस्थांमध्ये होणाऱ्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांना उद्योगांचे पाठबळ मिळाले, तर त्यातून उत्पादननिर्मिती शक्य होईल. त्यामुळे अशा परिषद उपयुक्त ठरतील.”