पुणे : शेतकऱ्यांना पिकविम्याचे पैसे त्वरित मिळावेत, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने आज (सोमवारी) ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीवर मोर्चा काढण्यात आला. तेथील अधिकाऱ्यांकडे कोणत्याही प्रकारची कागदपत्रे आणि माहिती नसल्याचे आढळून आले. त्यामुळे शिवसेना नेत्यांनीच त्यांना कागदपत्रे पुरवून पिकविम्याचे पैसे देण्याबाबत जाब विचारला. तब्बल २ लाख शेतकऱ्यांनी जवळपास ६०० कोटीची रक्कम विमा कंपनीकडे आली असूनही, ते शेतकऱ्यांना ती देत नाहीत. याउलट विम्याचे पैसे मागायला आलेल्या शेतकऱ्यांना उद्धटपणे बोलून त्यांना हाकलून दिले जात आहे. सादर कंपनीला पैसे न दिल्यामुळे आयआरडीएनेही दंड केलेला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांना समस्यांचे गांभीर्य समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पुढील सात दिवसात सर्व शेतकऱ्यांना थकीत रक्कम मिळेल, असे आश्वासन ओरिएंटल इन्शुरन्सकडून मिळाले असल्याचे पुणे जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख बाळा कदम यांनी सांगितले आहे. या मोर्चामध्ये रवींद्र मिर्लेकर, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे महादेव बाबर,शहर समन्वयक आनंद दवे यांच्यासह अनेक नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.