पुणे : “स्पर्धा परीक्षेतून अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून अनेक तरुण मेहनत घेतात. मात्र, इथे स्पर्धा मोठी आणि जागा कमी अशी स्थिती असल्याने अनेकांना अपयश येते. तीन-चार किंवा त्यापेक्षा अधिक वेळा परीक्षा देऊन यश मिळाले नाही, तर वैफल्य येते. मात्र स्पर्धा परीक्षेतील यश-अपयश हेच सर्वस्व नाही. त्यासाठी केलेल्या अभ्यासाचा उपयोग आपल्याकडील ‘बी प्लॅन’ यशस्वी करण्यासाठी करायला हवा,” असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव भूषण गगराणी यांनी केले.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना वास्तव ,भवितव्य व दिशा दाखवण्यासाठी आयोजित स्पर्धा परीक्षा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी भूषण गगराणी बोलत होते. यावेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष मधुकर कोकाटे, स्टडी सर्कलचे संचालक डॉ. आनंद पाटील, सृजन फाऊंडेशनचे संस्थापक व बारामती अॅग्रो फूड्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित पवार, एमपीएससी स्टुडंट्स राईट्सचे महेश बडे, किरण निंभोरे आदी उपस्थित होते.भूषण गगराणी म्हणाले, “तीस वर्षांपूर्वी अभ्यासासाठी काहीच माहिती किंवा मार्गदर्शन उपलब्ध नव्हते. आज माहितीचा खजिना आणि मार्गदर्शन करणारे क्लासेस मोठ्या प्रमाणावर आहेत. स्पर्धा परीक्षांविषयी जागृती झाल्याने त्याकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. अनेकजण स्वप्न घेऊन पुण्या-मुंबईत तयारी कारण्यासाठी येतात. खूप अभ्यासही करतात. मात्र, यशासाठी केवळ अभ्यास उपयुक्त नसतो. तर नियोजनबद्ध, सातत्यपूर्ण आणि सजगपणे केलेली तयारी तुम्हाला यशाकडे घेऊन जाते. स्पर्धा परीक्षेतील अभ्यासक्रमात सातत्याने बदल होत असतात. ते समजून घेऊन आपण तयारी केली पाहिजे. पालकांनी मुलांना प्रोत्साहन द्यावे. मात्र अवास्तव अपेक्षा असू नयेत. प्रशासनात येताना आपले उद्देश चांगले असावेत. स्पर्धा परीक्षेतील यश हे साध्य नसून, ते करिअरचे एक साधन आहे. मान-सन्मान आणि आदर हे आपल्या कामातून मिळत असते. त्यामुळे कामातील सचोटी, प्रामाणिकपणा महत्वाचा असतो.
मधुकर कोकाटे म्हणाले, “परीक्षा पद्धती नीट समजून घेणे गरजेचे आहे. कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड न बाळगता आपल्यातील क्षमता ओळखून त्याप्रमाणे तयारी केली पाहिजे. तीन-चार वर्षांच्या तयारीनंतर उत्साह कमी होतो. म्हणून विद्यार्थ्यांनी तीन-चार वेळा परीक्षेत यश आले नाही, तर त्यामागे धावण्यापेक्षा अन्य पर्यायांवर लक्ष्य केंद्रित केले पाहिजे. या परीक्षांमधील जागा अथवा पदे ही मर्यादित असणार आहेत. त्यामुळे अपयश आलेल्यांनी खचून जाऊ नये. या परीक्षांसाठी केलेल्या तयारीचा उपयोग अन्य करिअरसाठी करावा. या क्षेत्रातील मार्गदर्शकांनी अभ्यासक्रम शिकविण्यासोबतच प्रोत्साहकाची (मेंटॉर) भूमिका बजावायला हवी. एक चांगला नागरिक घडविण्याची जबाबदारी आपली आहे.”
आनंद पाटील म्हणाले, “स्पर्धा परीक्षा ही एक प्रकारची मॅरेथॉन आहे. या परीक्षा देण्यासाठी ‘शहाणपण’ असणे अधिक महत्वाचे आहे. आपल्यातील क्षमता ओळखून या परीक्षांमधील कोणता पर्याय निवडायचा ते ठरवावे. स्पर्धा परीक्षेच्या प्रेमात पडल्याशिवाय किंवा त्याचे व्यसन लागल्याशिवाय तुम्हाला त्यात यश मिळणार नाही. वेळेचे नियोजन, चांगल्या सवयी आपण लावून घेतल्या पाहिजेत. या परीक्षा म्हणजे व्यक्तिमत्व विकासाचा मार्ग आहे. या परीक्षांची तयारी करताना अभ्यासासोबतच आहार आणि आरोग्य या गोष्टींनाही महत्व द्यायला हवे.”
रोहित पवार म्हणाले, “विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करतानाच करिअरसाठी योग्य दिशा मिळावी, यासाठी हा महोत्सव आयोजिला आहे. आपले स्वप्न हे कुटुंब आणि मित्रपरिवाराचेही असते. त्यामुळे वेळीच आपण सजग होऊन, वास्तव समजून घेत वाटचाल केली पाहिजे. ज्या क्षेत्राची आपण निवड केली, त्यात प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे असते. अपयशाने खचून न जात अन्य संधींचा वेध घेत त्यामध्ये ध्येय निश्चित करून वाटचाल केली पाहिजे.
महेश बडे यांनी प्रास्ताविक केले. निलेश आरडळे, त्रिवेणी काहलकर, आरिप पटेल यांनी सूत्रसंचालन केले. किरण निंभोरे यांनी आभार मानले.