कबीरवाणी घराघरात, मनामनात पोहोचावी- डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे
संत कबीर जयंतीनिमित्त सोनग्रा प्रतिष्ठानतर्फे व्याख्यान
पुणे : “सार्वकालीन सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारी कबीरांची वाणी कान उघाडणी करणारी आहे. संगीतरूपी दोह्यातून त्यांनी प्रबोधनात्मक विचार मांडले. कोणत्याही कोशात न अडकणार निधर्मी अशा त्यांच्या रचना आहेत. त्यांच्या अनमोल रचना मराठीत आणून आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी अलौकिक काम केले आहे. संत कबीरांची ही कबीरवाणी संगीताबरोबरच ग्रंथरुपातही घराघरात आणि लोकांच्या मनात पोहोचायला हवी,” असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक व समीक्षक डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी केले.
सुफी संत कबीर यांच्या जयंतीनिमित्त आर. के. सोनग्रा प्रतिष्ठानच्या वतीने ‘मराठीत संत कबीर’ या विषयावर आयोजित व्याख्यानात डॉ. सहस्रबुद्धे बोलत होते. टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पटवर्धन सभागृहात झालेल्या या कार्यक्रमावेळी महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे सचिव व व्याख्याते डॉ. विकास आबनावे, ‘कबीरवाणी’चे अनुवादक आचार्य रतनलाल सोनग्रा, प्रकाशिका आरती सोनग्रा, दीपक चैतन्य, नागेश चव्हाण यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
डॉ. अनिल सहस्रबुद्धे म्हणाले, “जाती-धर्माच्या कोषातून मुक्त, कोणत्याही भेदभावाला स्पर्श न करणारे संत कबीर होते. त्यामुळेच आपल्याला कबीर प्रत्येकामध्ये सामावलेला दिसतो. कबीरांच्या साहित्यासारखे उन्नत, उदात्त, उत्तम आणि सात्विक साहित्य आपल्या मराठीमध्ये आले पाहिजे. त्यातूनच आपली भाषा अधिक समृद्ध होईल. संत कबीर पांडुरंगाच्या दरबारात आले हे आपले भाग्य आहे. प्रत्येकाच्या हृदयात प्रेम पेरण्याचा विचार कबीरांनी दिला. त्यांच्या प्रत्येक दोह्यात प्रेम ओतप्रोत भरलेले आहे. अशा कबीरांची वाणी प्रत्येक भाषेतून सर्वांपर्यंत पोहोचायला हवी.”
डॉ. विकास आबनावे म्हणाले, “कबीराला धर्मसत्ता अमान्य होती. जसे विचार तसेच आचरण हा एकच धर्म त्यांना मान्य होता. परमेश्वर आणि माणूस यांचे थेट नाते असावे. त्यामध्ये धर्ममार्तंडाचा हस्तक्षेप असू नये, असा त्यांचा आग्रह होता. खऱ्या अर्थाने ते मानवतेचे प्रेषित होते. वस्त्र विणता विणता त्यांनी जीवन जगण्याचा धागा विणला. प्रत्येकाला निःस्वार्थीपणे प्रेम वाटत चला, असा संदेश कबीरांनी आपल्या प्रत्येक रचनेत दिला आहे. आपण प्रत्येकाने कबीरांचा दोहा जगाला पाहिजे.”
आचार्य रतनलाल सोनग्रा म्हणाले, “संत कबीर हे अद्भुत रसायन आहे. जीवनाचा मार्ग दाखवणारा हा संत फार उशिराने मराठीत उलगडण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यांच्या रचना, प्रेमभाव प्रत्येकापर्यंत पोहोचविण्याच्या प्रयत्नातूनच माझे काम सुरु आहे.” दीपक चैतन्य यांनीही आपले मनोगत मांडले. आरती सोनग्रा यांनी प्रास्ताविक केले.