पाणवठ्यांच्या उभारणीत ‘जीआयएस’ महत्वपूर्ण -प्रा. सागर कोळेकर
पुणे : “कोणत्याही भागात पाझर तलाव, शेततळे किंवा माध्यम स्वरूपाचे बंधारे उभारण्यामध्ये भौगोलिक माहिती प्रणाली अर्थात ‘जीआयएस’ महत्वपूर्ण ठरते. ‘जीआयएस’च्या मदतीने योग्य पाण्याचे केंद्र शोधण्यात मदत होते,” असे मत भौगलिक माहिती प्रणालीचे अभ्यासक प्रा. सागर कोळेकर यांनी व्यक्त केले.
मराठी विज्ञान परिषदेच्या पुणे विभागाच्या वतीने आयोजिलेल्या वैज्ञानिक कट्ट्यावर भौगोलिक माहिती प्रणालीचा (GIS) वापर व जल संरक्षण या विषयावर प्रा. कोळेकर बोलत होते. मयूर कॉलनीतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन येथे झालेल्या या कट्टयावेळी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रा. विनय र. र., प्रा. राजेंद्रकुमार सराफ, संजय मालती कमलाकर आदी उपस्थित होते.
प्रा. सागर कोळेकर म्हणाले, “उपग्रहावरून त्या परिसराचा अभ्यास करण्यासाठी परिसराचा फोटो, एकंदरीत नकाशा मिळवून त्या परिसरात कोणत्या प्रकारची माती उपलब्ध आहे, हे पाहणे. त्याठिकाणी पावसाचे प्रमाण किती, पाणी झिरपते कि वाहून जाते, याचा अभ्यास केला जातो. त्यानुसार पाणवठे तयार केले, तर अधिक चांगला परिणाम मिळतो. जेव्हा आपण अशा प्रकारचे पाणी अडवण्यासाठी काम करत असतो, तेव्हा या गोष्टी माहित असणे फार गरजेचे आहे. दिसली जागा बांधला ओढा शेततळे असे होत नाही त्या परिसराचा जागेचा अभ्यास करणे हि महत्वाचे आहे. आजही आपण इग्रजांच्या काळात त्यांनी तयार केलेले टोपोशीट वापरून त्या त्या जागेचा अभ्यास करू शकतो. त्या काळात इग्रजांनी बनवलेले टोपोशीट अगदी आजही योग्य तसेच आहेत.”
प्रा. विनय र. र. यांनी आभार मानले. प्रा. राजेंद्रकुमार सराफ यांनी प्रस्तावना केली.