अवयवदानाने आठ, तर पेशींदानाने ५० व्यक्तींना मिळते जीवदान-प्रीती दामले
पुणे : अवयवदानाची जनजागृती करणे आज खूप महत्वाचे आहे. अवयवदानाचे दोन प्रकार असतात. यात एक संपूर्ण अवयव आणि दुसरे पेशीदान. अवयवदानाने आठ, तर पेशीदानाने ५० लोकांचे जीव वाचू शकतात. अवयदानामध्ये दोन मूत्रपिंडे, यकृत, फुप्फुसे, हृदय आणि स्वादुपिंड या अवयवांचा समावेश होतो. अवयवातील एक पेशींचा समूह ज्याने तुम्ही ५० लोकांचे जीव वाचू शकतो. यामध्ये डोळ्याच्या बाहुलीचा पारदर्शक पडदा, स्नायुबंध, रक्तवाहिनी, त्वचा आणि हाडे याचा समावेश होतो, असे मत समवेदना फाउंडेशनच्या सीईओ प्रीती दामले यांनी व्यक्त केले.
मराठी विज्ञान परिषदेतर्फे एस. एम. जोशी सभागृहात आयोजित वैज्ञानिक कट्ट्यावर प्रीती दामले ‘अवयवदानाचे महत्व‘ या विषयावर बोलत होत्या. सह्याद्री हॉस्पिटलचे डॉ. शर्मिला पाथे, सह्याद्री हॉस्पिटलचे डॉ. धनंजय चांदककर, विज्ञान परिषदेचे अध्यक्ष विनय र. र., संजय मालती कमलाकर आदी उपस्थित होते.
प्रीती दामले म्हणाल्या, “जिवंतपणी दात्याच्या शरीरातून १ मूत्रपिंड, १/३ अंश यकृत, स्वादुपिंड आणि त्वचेचा दान करू शकतात. मेंदू मृत अवस्था म्हणजे ज्यात रुग्णाचे कृत्रिम स्वासोच्छवासाशिवाय श्वास घेऊ शकत नाही आणि कालांतराने हृदयही बंद होते. या अवस्थेतील रुग्णाचे दोन मूत्रपिंडे, यकृत, फुप्फुसे, हृदय, स्वादुपिंड, डोळ्याच्या बाहुलीचा पारदर्शक पडदा आणि त्वचा दान करता येते. या परिस्थितीत अवयवदान करण्यास कायद्याने मान्यता दिली आहे. मृत अवस्थेत रुग्णाचे डोळ्याच्या बाहुलीचा पारदर्शक पडदा आणि त्वचा दान करता येते. या सर्व अवस्थेत महत्त्वाचे म्हणजे हे अवयव सदृढ असणे खूप गरजेचे आहे तरच त्याचा वापर दुसऱ्या प्राप्तकर्त्याला होऊ शकतो. व्यक्तींना अवयवदान करायचे असल्यास ती व्यक्ती अर्ज भरू शकते आणि डोनरकार्ड आपल्या जवळ बाळगू शकते.”
“अवयवदानाबद्दल समाजात जागृती करणे गरजेचे आहे. अवयवदानात पैशांची देवाणघेवाण होत नाही. दात्याचे नाव आणि प्राप्त कर्त्याचे नाव गुपित ठेवले जाते. काही देशात मेंदू मृत अवस्थेत आणि मृत्युमुखी अवस्थेत अवयवदान करणे बंधनकारक असतो. भारतात सध्या तरी हा कायदा नाही. पण इतरत्र देशात रुग्णाचा औपचारावर खर्च जर सरकार करत असेल, तर त्या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यास त्याला अवयवदान करणे बंधनकारक आहे,” असे डॉ. धनंजय चांदककर यांनी सांगितले.
प्रस्तावना संजय मा. क., परिचय दिपक अडगावकर आणि आभार विज्ञान परिषदेचे अध्यक्ष विनय आर. आर. यांनी मानले.