बँकिंग व्यवस्थेला सनदी लेखापालांनी बळ द्यावे -सुब्रह्मण्यम स्वामी यांचे मत
यसीएआय’तर्फे दोन दिवसीय ‘बँक ऑडिट कॉनक्लेव्ह’
पुणे : “भारतीय बँकिंग व्यवस्था अतिशय चांगली आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये आलेल्या मंदीतही भारताची अर्थव्यवस्था त्यामुळेच तग धरू शकली होती. महसूल निर्माण, संचयी मालमत्ता यामध्ये भारतीय बँका चांगली कामगिरी करत आहेत. नियमांचे उल्लंघन आणि गैरमार्गाने दिलेली कर्जे यामुळे गेल्या १० वर्षात बँकिंग व्यवस्था कमकुवत झाली आहे. सनदी लेखापालांना बँकेच्या व्यवहारांची माहिती असते. त्यामुळे वस्तुस्थिती लक्षात आणून देत सनदी लेखापालांनी बँकिंग व्यवस्थेला बळकट करावे,” असे मत राज्यसभा खासदार आणि अर्थतज्ज्ञ सुब्रह्मण्यम स्वामी यांनी व्यक्त केले.
दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) पश्चिम भारत विभागीय परिषद (डब्ल्यूआयआरसी), पुणे शाखा आणि पिंपरी-चिंचवड शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय ‘बँक ऑडिट कॉनक्लेव्ह’च्या उद्घाटनप्रसंगी सुब्रह्मण्यम स्वामी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत होते. बाणेर रस्त्यावरील यशदा येथे होत असलेल्या या परिषदेला कॉसमॉस बँकेचे चेअरमन सीए मिलिंद काळे, ‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, विभागीय सदस्य सीए आनंद जाखोटिया, ‘आयसीएआय’ पुणे शाखेच्या अध्यक्षा सीए ऋता चितळे, उपाध्यक्ष सीए अभिषेक धामणे, ‘आयसीएआय’ पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष सीए संतोष संचेती, सीए समीर लड्डा, सीए काशिनाथ पाठारे आदी उपस्थित होते.
सुब्रह्मण्यम स्वामी म्हणाले, “बँकांनी गेल्या काही वर्षात नियमबाह्य पद्धतीने कोणत्याही प्रकारचे तारण न घेता निरव मोदी, मेहुल चोक्सी, विजय मल्ल्या यांच्यासारख्या लोकांना कर्जे दिली. राजकीय हस्तक्षेपाने ही मंडळी कर्जे बुडवून परदेशात पळाली आहेत. आयसीआयसीआय बँकेत पदाचा गैरवापर झाला. हे टाळण्यासाठी सनदी लेखापालांनी पुढाकार घ्यायला हवा. तरच आगामी काळात बँकिंग व्यवस्था आणखी सक्षम बनेल.’
सीए मिलिंद काळे म्हणाले, “लेखापाल हा नियंत्रकाच्या भूमिकेतही असायला हवा. बँकिंग क्षेत्रातील घोटाळे व्यवस्थेचे अपयश आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार लेखापालांनी काम केले पाहिजे. आपण वापरत असलेली प्रणाली पुरेशी आहे का, याचाही विचार केला पाहिजे. केवळ क्रेडिट रिस्क (जमा जोखीम) आणि अनुत्पादित कर्जाचे वर्गीकरण एवढेच काम अपेक्षित नाही. बँकिंग व्यवस्थेचा पुरेसा अभ्यास असणेही गरजेचे आहे.”
सीए चंद्रशेखर चितळे म्हणाले, “कोणत्याही कंपनीच्या आर्थिक व्यवहारात लेखापाल महत्वाची भूमिका बजावत असतो. त्यामुळे पारदर्शक व्यवहारावर त्याने अधिक भर दिला पाहिजे. बँकांना अधिकाधिक पारदर्शक कारभारासाठी सल्ला दिला पाहिजे. समाजातील आर्थिक बाबींचे आरोग्य जपणाऱ्या लेखापालाला अधिक सक्षम करण्यासाठी सीए इन्स्टिट्यूट अद्ययावत तंत्रप्रणाली आणि माहितीचा साठा उपलब्ध करून देत आहे.”
रिझर्व्ह बँकेच्या प्रसिद्धिपत्रकानुसार व्यावसायिक बँकांचे लेखापालन करताना अहवालात गंभीर त्रुटी किंवा अफरातफर आढळल्यास रिझर्व्ह बँकेच्या लेखापालाच्या यादीतून नाव कमी होऊ शकते. त्यामुळे लेखापालांनी योग्य ती काळजी घेणे महत्वाचे असल्याचे सीए ऋता चितळे यांनी नमूद केले. सीए संतोष संचेती यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. सीए अभिषेक धामणे यांनी आभार मानले.
दोन दिवसांच्या या परिषदेत ‘आगाऊ रकमेची पडताळणी’, ‘एनपीए-आयआरएसी नॉर्म्स’, ‘गैरव्यवहार तपास’, ‘लेखापरीक्षणाचे नियोजन’, ‘सीबीएस ऑडिट’, ‘आंतरराष्ट्रीय व्यवहारातील तरतुदी’, ‘कर लेखापरीक्षण’, ‘बँक ब्रँच ऑडिट’ आदी विषयांवर सीए आय. बी. सोनावाला, सीए धंनजय गोखले, सीए नितांत त्रिलोकेकर, सीए सुहास देशपांडे, सीए उदय कुलकर्णी, सीए गोकुळ राठी, सीए निरंजन जोशी, व्ही. सोमासेखर आदी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.