पुणे : “देशाच्या सीमेवर लढताना जवान शहीद झाल्यानंतर समाजाच्या विविध स्तरांतून पाठिंबा, आधार मिळतो. कृतज्ञतेच्या भावनेतून अनेकजण पाठीशी उभे राहतात. परंतु, आयुष्याच्या अखेरपर्यंत स्वाभिमानाने जगण्यासाठी वीरपत्नींनी स्वावलंबी बनले पाहिजे. स्वाती महाडिक, गौरी महाडिक या तरुणीं पती शहीद झाल्यानंतर प्रशिक्षण घेऊन सैन्यात दाखल झाल्या, ही आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी गोष्ट आहे,” असे प्रतिपादन ब्रिगेडियर (निवृत्त) रघुनाथ जठार यांनी केले. घरातील कर्ता व्यक्ती गेल्यानंतर त्या कुटुंबावर कोसळलेल्या दुःखाचे सांत्वन आपण शब्दात करू शकत नाही, असेही त्यांनी नमूद केले.
जागतिक महिला दिनानिमित्त जाणीव संघटना व वंचित विकास संस्थेतर्फे पुणे जिल्ह्यातील वीरमाता, वीरपत्नी आणि वीरपित्यांचा सन्मान करण्यात आला. देशाच्या सीमेवर संरक्षण करताना वीरमरण आलेल्या सैनिकाप्रती व त्यांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून हा सोहळा आयोजिला होता. काही दिवसांपूर्वीच शहीद झालेल्या मेजर शशिधरन नायर यांच्या पत्नी तृप्ती नायर, अबोली मोहोरकर, सोनाली सौरभ फराटे, भारत-चीन युद्धापासून आपल्या पतीच्या प्रतीक्षेत असलेल्या मालती जगताप यांच्यासह एकूण ५५ वीरमाता-वीरपत्नींचा सन्मान करण्यात आला. विजयकुमार मर्लेचा यांनी आपल्या मातोश्री कांताबाई यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मानचिन्ह दिली. या कार्यक्रमासाठी जयंत नातू यांनी सभागृह व अल्पोपहार उपलब्ध करून दिला.
कर्वे रस्त्यावरील अश्वमेध सभागृहात झालेल्या हृद्य सोहळ्याला जिल्हा सैनिक बोर्डाचे मेजर (निवृत्त) मिलिंद तुंगार, कॅप्टन (निवृत्त) सुरेश जाधव, ऍड. इंद्रजित सिंग गिल, वीरपत्नी अबोली मोहोरकर, वंचित विकास संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा, संचालिका मीनाताई कुर्लेकर, सुनिता जोगळेकर, कार्यकर्त्या मीनाक्षी नवले, देवयानी गोंगले, चैत्राली वाघ आदी उपस्थित होते. मानचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्प असे या सन्मानाचे स्वरुप होते. देशभक्तीपर गीतांची धून, शहीद जवानांविषयीच्या आठवणी यामुळे सभागृह भारावून गेले होते. अनेकींच्या डोळ्यांत आसवे दाटून आली होती. भावुक वातावरणात सन्मान स्वीकारताना अनेकींच्या डोळ्यांत अश्रू दाटून आल्याचे पाहून उपस्थितांचे मन हेलावून गेले. प्रत्येकजण आपल्यासोबत असल्याचा विश्वास या शहीदांच्या कुटुंबियांना देत होता.
अबोली मोहोरकर म्हणाल्या, “शहीद झाल्यानंतर कुटुंबियांना सहानुभूती देण्यासाठी अनेकजण भेटतात. पण कालांतराने हळूहळू ते कमी होते. सैनिकांविषयीच्या माहितीचा अभाव अजूनही दिसतो. आर्थिक मदतीची, सहानुभूतीची आम्हाला गरज नसते. परंतु, आपलेपणाचा भावनेने बोलणारे आणि सोबत राहणारे माणसे हवी असतात. ग्रामीण भागातील शहीदांच्या पत्नी, त्यांची मुले यांच्यासाठी काम करण्याची गरज आहे. संस्थेने त्यात पुढाकार घेतल्यास मोठे काम उभे राहू शकते.”
मीनाताई कुर्लेकर म्हणाल्या, देशासाठी बलिदान देणार्या सैनिकांच्या कुटुंबीयांबरोबर काम करण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. यापुढे ज्या शहीदांच्या कुटुंबियांना न्याय मिळालेला नाही, अशांसाठी संस्था मदत करेल. आपल्या सगळ्यांसमवेत आम्ही आहोत. त्यामुळे आपण खचून जायचे नाही. तुम्ही आमच्यासाठी प्रेरणा आहेत. गौरी कुलकर्णी व मंजिरी तिक्का यांनी शहीदांच्या कुटुंबियांसाठी गायन सादर केले. श्रीराम ओक यांनी निवेदन केले. मीनाताई कुर्लेकर यांनी आभार मानले.