विद्यार्थ्यांनी स्वयंशिस्त, मानवतेची भावना अंगीकारावी -अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनील फुलारी
पुणे : “आयुष्यात अनेकदा अडचणीचे प्रसंग येतील. त्यातून स्वतःला उभे करण्याचे धैर्य हवे. शेवटपर्यंत शिकत राहण्याची आस असावी. तसेच व्यवस्थापन कोणत्याही प्रकारचे असले, तरी त्यात स्वयंशिस्त आणि मानवतेच्या भावनेतून काम केले, तर अधिक यशस्वी होता येते,” असा सल्ला पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनील फुलारी यांनी विद्यार्थ्यांना दिला. सोशल मीडिया वापरताना आपल्याकडून सायबर गुन्हा होत नाहीना, याची काळजी विद्यार्थ्यांनीही घ्यायला हवी, असेही त्यांनी नमूद केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापी ठाशी संलग्नित मिटसॉम महाविद्यालयाच्या वतीने आयोजित पदवीग्रहण सोहळ्यावेळी सुनील फुलारी बोलत होते. प्रसंगी व्यासपीठावर मुंबई येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप उके, एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू व मिटसॉम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवीकुमार चिटणीस, मिटसॉम महाविद्यालयातील मुख्य परीक्षा अधिकारी डॉ. अंजली साने, बीबीएच्या विभागप्रमुख प्रा. सुमिता जोशी, बीबीए(सीए)च्या विभागप्रमुख प्रा. विनया निंबोलकर, एमसीएच्या विभागप्रमुख प्रा. सुदिप्ता बॅनर्जी, वरिष्ठ प्रा. डॉ. प्रसाद पाठक, विद्यार्थी प्रतिनिधी शिवानी कुदळे आदी उपस्थित होते.
डॉ. दिलीप उके म्हणाले, “ज्ञानाबरोबरच मूल्यांचे शिक्षण घेणे गरजेचे आहे. विज्ञान-तंत्रज्ञानातील बदलांमुळे आपण जीवनाची मूल्ये हरवत चाललो आहोत. जातीधर्माच्या पलीकडे जाऊन प्रत्येकाने माणुसकीचे नाते जपत राष्ट्राप्रती आपले कर्तव्य बजावले पाहिजे. एकमेकांचा तिरस्कार न करता समानतेच्या भावनेने काम करावे. आपल्या कामाचा उपयोग समाजहितासाठी होईल, यावर भर द्यावा.”
विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला. प्रा. रवीकुमार चिटणीस यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अंजली साने यांनी आभार मानले.