पुणे-माणसाचं जीवन दिवसेंदिवस खडतर बनत चाललं आहे ,एकीकडे हजारो कोटीचे घोटाळे करून पलायन करून परदेशात मौजमजा करणारी काही मंडळी दिसतात ,एकीकडे हजारो कोटी रुपयांच्या कंपन्यांचे मालक जे ‘आम्ही कठोर परिश्रमातून यशस्वी उद्योजक झालोत ‘ असे सांगत ..त्यातील काही कारागृहात खितपत पडलीत ..तर दुसरीकडे … कायम स्वरूपी नौकरी नाही, व्यवसायात फारशी झेप घेता येत नाही म्हणून चिंताग्रस्त बनत चाललेला समाज हि वारंवार आपलं भयाण रूप दाखवितो आहे ….असेच भयाण रूप पुन्हा एकदा पुण्याला दिसलं…
कर्जबाजारीपणामुळे पुण्यातील शिवणे येथे एका व्यावसायिकाने पत्नी व दोन मुलींचा खून करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि.16 फेब्रुवारी) रात्री साडेदहाच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेनंतर पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे. नीलेश सुरेश चौधरी (वय-38), असे आत्महत्या करणार्या व्यावसायिकाचे नाव आहे. त्याने आत्महत्येपूर्वी पत्नी निलम चौधरी (वय-33) मुली श्रेया चौधरी (वय-7) आणि श्रावणी चौधरी (वय-9) यांची हत्या केली. निलेश चौधरी याच्या खिशात चिठ्ठी मिळाली असून कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करत असल्याच्या उल्लेख त्यात आहे
‘फक्त एकच खंत आहे, माझ्या दोन्ही मुली, ज्या माझ्यावर जिवापाड प्रेम करत होत्या, देखण्या व अभ्यासात अतिशय हुशार. त्यांची आमच्या नंतर फरफट होऊ नये यासाठी त्यांनाही बरोबर नेत आहोत….. ‘ हे शब्द आहेत कर्जबाजारीपणामुळे आपल्या पत्नी आणि दोन मुलींचा खून करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या नीलेश चौधरी यांचे. त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिट्ठीत आत्महत्या करण्यामागील कारण स्पष्ट केले आहे.
त्यामध्ये चौधरी यांनी लिहून ठेवले आहे की-
‘मी निलेश सुरेश चौधरी आज रोजी माझ्या व माझ्या कुटुंबियांच्या सहमतीने व्यवसायातील अपयशामुळे जीवन संपवत आहे. यासाठी कोणासही जबाबदार धरू नये. माझ्या व्यावसायातील आर्थिक व्यवहाराचा माझ्या आई-वडीलांशी आणि इतर नातेवाईक मित्रमंडळींशी काहीही संबंध नाही. तरी त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास झाल्यास पोलिसांनी सहकार्य करावे. आमची शेवटची इच्छा म्हणून अवयवदान करण्यात यावे ही नम्र विनंती’
‘आम्ही या परिस्थितीतून बाहेर येण्याचा खूप प्रयत्न केला, गेली चार वर्षापासून पण आम्हाला कुठलाही मार्ग दिसत नव्हता. आम्ही खूप विचार करून हे टोकाचे पाऊल उचलले आहे. काही लोकांनी माझे जगणे मुश्कील करून टाकले होते. त्यांची नावे घेऊन मी मरताना कुणाला अडचणीत आणू इच्छित नाही.मला कुणाचेही नुकसान करायचे नव्हते, पण या चक्रव्युहातून बाहेर पडू शकणार नाही’ त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे त्यांनी चिठ्ठीत नमूद केले आहे.