पुणे- पुरेसे न्यायाधिश नसल्याने कोट्यावधी केसेस वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. घटनेने नागरिकांच्या स्वातंत्र्याची ग्वाही दिलेली असतांनाही आरोपींना गुन्हा सिद्ध होण्याआधीच वर्षानुवर्ष तुरुंगवास भोगावा लागतो. ही एक मोठी समस्या असुन त्याकडे समाजाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न ‘जमानत ‘ या लघुपटाच्या माध्यमातुन केला आहे असे प्रसिद्ध साहित्यिक संजय सोनवणी यांनी येथे सांगितले. सर्वच पोलीस सारखे नसतात , चांगली माणसे , चांगले पोलीस हि समाजात आहेत, पण काही दुष्प्रवृत्ती जशा सर्व क्षेत्रात असतात तशा येथे हि असू शकतात .आणि त्यांच्यामुळे कित्येक कुटुंबे उध्वस्त होतात . अशावेळी कायद्याचा आधार त्यांना तातडीने मिळाला तर…कदाचित अशी कुटुंबे उध्वस्त होण्यापासून वाचू शकतील ; दबाव असला आणि तरीही आरोपी मिळत नसले तर पोलिस सामान्यांना न केलेल्या गुन्ह्यात बळीचा बकरा बनवून आत टाकू शकतात. किंवा वर्षानुवर्ष लाखो कैदी जामीनाच्या प्रतीक्षेत तुरुंगात सडत राहतात. त्यांच्यासाठी संघर्ष करायला क्वचित कोणी येतो आणि आला तरी तोही व्यवस्थेसमोर हतबल होऊन जातो. “जमानत” या हिंदी लघुपटात न्यायव्यवस्था आणि आपल्या समाज व्यवस्थेची शोकांतिका चितारण्यात आली आहे. संजय सोनवणी यांनी या लघुपटाचे लेखन व दिग्दर्शन केले असुन निर्माते पत्रकार शरद लोणकर हे आहेत. या लघुपटात मयुर लोणकर, निकिता ओंबासे, आनंद कोकरे, अभिषेक लोणकर, सुशांत जावीर, सोमनाथ मातेरे यांनी भुमिका केल्या आहेत.
जमानत (पहा हिंदी लघुपट- व्हिडीओ )