मुंबई – प्रसिद्ध उद्योजक आणि गोदरेज ग्रुपचे चेअरमन आदी गोदरेज यांनी भारतात वाढत्या जातीभेद आणि असहिष्णुतेवर नाराजी व्यक्त केली. असहिष्णुता, घृणा आणि धर्म व जातीच्या आधारे होणाऱ्या हिंसाचारांमुळे देशाच्या आर्थिक विकासाला फटका बसू शकतो. आदी गोदरेज यांनी शनिवारी एका महाविद्यालयाच्या कार्यक्रमात आपले मत मांडले आहे.
गोदरेज यांनी कार्यक्रमात बोलताना, नव्या भारताच्या निर्माण आणि 5 ट्रिलियनच्या अर्थव्यवस्थेसाठी विशाल दृष्टीकोन ठेवणाऱ्या पीएम नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या. परंतु, देशात सर्व काही सुरळीत सुरू नाही अशी खंत व्यक्त केली. गोदरेज यांनी समाजातील परिस्थिती आणि विकासदरावर चिंता व्यक्त केली. देशाला अजुनही गरीबीची समस्या भेडसावत आहे ही गोष्ट विसरू नये. या परिस्थितीमुळे आर्थिक विकासाला नुकसान होऊ शकते. देशभरात जात, धर्मावरून हिंसाचार, महिलाविरोधी हिंसाचार आणि इतर प्रकारच्या असहिष्णुता वाढत आहेत, ही सामाजिक सलोख्यासाठी मुळीच चांगली गोष्ट नाही.
4 दशकांतील बेरोजगारीचा उच्चांक
बेरोजगारीवर सुद्धा आदी गोदरेज यांनी आपल्या चिंता मांडल्या. देशात बेरोजगारीचा दर 6.1 टक्के आहे. गेल्या 4 दशकांतील हा उच्चांक आहे. यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारी नव्हती. ही परिस्थिती लवकरच आटोक्यात आणणे आवश्यक आहे. जल संकट, प्लास्टिकचे वाढते वापर, ढासळलेली आरोग्य यंत्रणा या सर्वच समस्यांवर युद्ध पातळीवर काम करणे आवश्य आहे.