पुणे मदतीवर अवलंबून राहण्याची मानसिकता बदलली तर आपला देश नक्कीच महासत्ता बनेल असा विश्वास ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक जयप्रकाश गोयल यांनी व्यक्त केला. स्वातंत्र्य दिवस व गोयल गंगा ग्रुपचा ३५ वा वर्धापन दिन याचे औचित्य साधून आयोजित केलेल्या कार्यक्रमात गोयल बोलत होते. यावेळी अशोक अग्रवाल, अतुल गोयल, अमित गोयल, अरुण गुप्ता, स्वप्नील अग्रवाल, राजाभाऊ कदम, बिपीन शहा, कुमार देवी उपस्थित होते.
गोयल म्हणाले की, समाजवादाच्या नावावर लोकांमध्ये अवलंबून राहण्याची प्रवृत्ती वाढली आहे. ही मानसिकता बदलली पाहिजे. लोकांना असे शिक्षण दिले पाहिजे की, ज्यामुळे ते स्वतःच्या पायावर उभे राहतील, आणि पुढे जाऊन देशासाठी त्यांच्या शिक्षणाचा फायदा होईल. मोफत शिक्षणाऐवजी गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावे. पैशाचा सदुपयोग कसा करावा याचे शिक्षण दिले पाहिजे. ब्रिटीशांचे फोडा आणि राज्य करा हे धोरण राबवून राज्यकर्ते राज्य करणार असतील, देश लुटणार असतील तर प्रगतीला खिळ बसेल.
ते पुढे म्हणाले की, जन्मदिवशी असे काही करा की लोकांच्या आठवणीत राहील. आम्ही बडेजावपणा न करता योगा व प्राणायाम यांची शिबीरे आयोजित करणे, होमीओपॅथी सारख्या उपचारांचे महत्व, छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन, बी पॉझीटीव्ह यांसारख्या पुस्तकांचे वाटप करणे असे विविध सामाजिक उपक्रम राबवत असतो.
गोयल गंगा ग्रुपमधील गुणवंत कामगार व त्यांच्या कुटूंबियांना विशेष सन्मान देवून यावेळी गौरविण्यात आले. मजूर, कंत्राटदार, सुरक्षारक्षक आदी कर्मचा-यांच्या गुणवंत मुलांना त्यांच्या पालकांसमवेत गौरविण्यात आले. फॅमिली अॅचीव्हमेंट अवार्ड, बेस्ट टीम परफॉर्मन्स अवार्ड आदी पुरस्कारही यावेळी देण्यात आले.