जागृत मतदार हाच लोकशाहीचा आधार
राज्य आणि राष्ट्राच्या विकासाची चावी निवडणूकीसाठी उभे राहिलेल्या उमेदवाराच्या हातात नसून ती चावी मतदारांच्या हातात आहे. उमेदवारांच्या हातात देशाच्या विकासाची चावी आहे असे लोकांना वाटत असेल तर स्वातंत्र्याच्या 73 वर्षानंतरही देशाची ही अवस्था होण्याचे कारण काय?
जागृत मतदार सदृढ व निकोष लोकशाहीचा आधार आहे. राज्य आणि राष्ट्राला बदलण्याची चावी मतदारांच्या हातामध्ये असूनही मतदार ते चावी लावण्यास विसरले आहेत. एक नोट मिळाली की मतदार भ्रष्टाचारी, गुंड, सरकारी तिजोरीची लुट करणारा, व्यभीचारी उमेदवाराला आपले मत देतो. यामुळे विधानसभा व लोकसभा सारख्या पवित्र मंदीरामध्ये कलंकीत व भ्रष्टाचारी उमेदवार निवडून जातात. हे लोक राज्य आणि देशाचे भविष्य कसे घडविणार? यामुळे मतदारांनी विचार करण्याची गरज आहे. भारत मातेची शपथ घेऊन प्रतिज्ञा करायला हवी की मी निवडणूकीमध्ये भ्रष्टाचारी, गुंड, लुटारू, व्यभिचारी उमेदवाराला माझे अमुल्य मत देणार नाही. जो उमेदवार चारित्र्यशिल आहे, समाज आणि राष्ट्राच्या भल्यासाठी दिव्यासारखा रात्रंदिवस जळत आहे, जनतेची सेवा करणाऱ्या उमेदवारालाच माझे मत देईल. ही चावी मतदारांनी लावली तर राज्य आणि देश बदलेल.
आज राजकारणातील अनेक उमेदवार भ्रष्टाचार केल्यामुळे वेगवेगळ्या जेलमध्ये गेलेले आहेत. याला जबाबदार मतदार आहे. मतदार कोणत्याही आमिषाला बळी न पडता राज्य, राष्ट्र आणि समाजाच्या भल्यासाठी सेवाभावाने काम करणाऱ्या उमेदवाराला आपले मत दिले असते तर बदल घडला असता. असे उमेदवार जेलमध्ये गेले नसते.
अनेक मतदार म्हणत आहेत की, असा चारित्र्यशिल उमेदवार मिळणे कठीण आहे त्यामुळे मत द्यायचे कुणाला? अशा वेळी उमेदवारामध्ये जो भ्रष्टाचारी आहे, चारित्र्यशिल नसेल तर ‘नोटा’ च्या चिन्हावर मोहर लावावी. फक्ट ‘नोटा’ वर मोहर लावून बदल घडणार नाही हे आपणाला माहित आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडे आमची मागणी होती की ज्या निवडणूक क्षेत्रामध्ये उमेदवाराला जेवढे मत मिळाले आहेत त्यापेक्षा जास्त मत ‘नोटा’ ला मिळाले तर निवडणूक रद्द करून फेरनिवडणूक घ्यावी आणि मतदारांनी नाकारलेल्या उमेदवारांना परत निवडणूकीसाठी उभे राहण्यास परवानगी नसावी. यामुळे पक्ष-पार्ट्या गुंड, भ्रष्टाचारी, लुटारू, व्यभीचारी उमेदवाराला तिकीट देणार नाहीत. ज्यामुळे लोकसभा व विधानसभासारख्या पवित्र मंदीरामध्ये चारित्र्यशिल उमेदवार निवडून जातील. परंतु निवडणूक आयोगाने तसे न करता ईव्हीएम मशीनवर शेवटी ‘नोटा’ आणले. मतदारांनी ‘नोटा’ ला अधिक मतदान केले तर त्या निवडणूक क्षेत्रामध्ये जे उमेदवार निवडणूकीसाठी उभे आहेत त्यांना आपण निवडणूकीसाठी लायक नाहीत त्यामुळेच आपल्यापेक्षा ‘नोटा’ ला अधिक मत मिळाले असे वाटेल.
मतदारांनी 1857 ते 1947 या 90 वर्षाच्या काळात स्वातंत्र्यासाठी ज्या लाखो लोकांनी बलिदान केले त्यांचे स्मरण करून आपले मत सेवाभावी उमेदवारालाच द्यावे.
धन्यवाद.
आपला,
कि. बा. तथा अण्णा हजारे