देशात लोकशाही ऐवजी धर्मसंसद आणण्याचा प्रयत्न-डॉ.कुमार सप्तर्षी
पुणे : संसदीय लोकशाहीपेक्षा धर्मसंसद हा शब्द देशात वाढत आहे. प्रत्यक्षात संसद आणि धर्माचा काहीही संबंध नाही. ज्यांना देशात लोकशाही नको आहे, ते धर्मसंसद आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. संसदेचे तुकडे करण्याकरीता धर्माचे घाव घातले जात आहेत. प्रत्यक्षात कोणाचीही डोकी न उडवता, डोक्यात बदल करणे हा लोकशाही मार्ग आहे, असे सांगत ज्येष्ठ विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीचे विश्लेषण केले.
येथील एका कार्यक्रमात बोलताना डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले, सध्या धर्माच्या नावावर मतदान होत आहे. माणसाला माणसाशी जोडण्याकरीता जे सांगावे लागते, तो धर्म. माणसाला माणसापासून तोडणारा धर्म नव्हे. लोकशाहीमध्ये व्यक्ती आणि त्याच्या चांगल्या विचारांना मतदान व्हायला हवे, धर्म पाहून मतदान करणे चुकीचे आहे. लोकशाहीमध्ये राजकारणातील शिळे लोक कमी होऊन, नवीन तरुण रक्त आल्यास देशाची स्थिती नक्कीच बदलेल, असेही त्यांनी सांगितले.