विचारांशी प्रतारणा न करणारे वडीलधारे व्यक्तिमत्व म्हणजे डॉ कुमार सप्तर्षी- उद्धव ठाकरे
पुणे :
‘ राजकीय विचारांनी विचारांचा पराभव करा ,विरोधकांना संपवू नका ‘ असे सांगणारे ,खुर्चीसाठी विचारांशी प्रतारणा न करणारे वडीलधारे व्यक्तिमत्व म्हणजे डॉ कुमार सप्तर्षी आहेत ,पुढच्या पिढीने कोणाकडे पाहायचे या प्रश्नाचे डॉ सप्तर्षी यांचे व्यक्तिमत्व हे उत्तर आहे ‘. त्यांचे आणि आमचे विचार वेगळे असले तरी देशाप्रती समर्पित युवक घडविण्याचे उद्दिष्ठ एक आहे ‘ असे प्रतिपादन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी पुण्यात केले . ‘
‘युवक क्रांती दला’चे संस्थापक आणि ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’चे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या वयाला 75 वर्षे झाल्या निमित्त अमृत महोत्सव जीवन गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी दुपारी गणेश कला क्रीडा मंच (पुणे ) येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाला डॉ उर्मिला सप्तर्षी ,उद्धव ठाकरे (शिवसेना पक्ष प्रमुख), पृथ्वीराज चव्हाण (माजी मुख्यमंत्री, महाराष्ट ्रराज्य), गिरीश बापट (पालकमंत्री, पुणे जिल्हा), अरुण गुजराथी (माजी सभापती, महाराष्ट्र राज्य विधीमंडळ), , हुसेन दलवाई (खासदार), प्रशांत जगताप (महापौर), बच्चू कडू (आमदार), डॉ सदानंद मोरे (माजी अध्यक्ष, मराठी साहित्य संमेलन), गिरीश कुलकर्णी (राष्ट्रपती पारितोषिक विजेते कलाकार), डॉ. मिलिंद आव्हाड (जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली), रजनी पाटील ,बबनराव पाचपुते आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आणि ‘डॉ.कुमार सप्तर्षी जीवन गौरव समिती’च्या वतीने डॉ.कुमार सप्तर्षी यांना मानपत्र प्रदान करण्यात आले. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतर्फे गणेश मूर्ती ,शाल भेट दिली . न्या.नरेंद्र चपळगांवकर (निवृत्त) हे डॉ. कुमार सप्तर्षी जीवन गौरव समारंभ समितीचे अध्यक्ष कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते.
प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले,’ डॉ सप्तर्षी हे वादळ आहेत ,आणि वादळाचा जोर अजून ओसरला नाही . युवक क्रांती चे काम आजही संपलेले नाही . डॉ सप्तर्षी यांनी सुरुवातीपासून क्रांती केली . जे ठरवले तसेच जगले . गांधीजींचा सत्याग्रह हेच शस्त्र त्यांनी वापरले . इसिस मध्ये तरुण दाखल होत आहेत ,हा धोक्याचा इशारा आहे . त्यामुळे डॉ सप्तर्षी यांच्या प्रमाणे आम्ही जात पात मानत नसलो तरी आम्ही धर्म मानतो,कारण धर्म मानला नाही ,तर अधर्म येईल याची भीती वाटते . ‘
डॉ पृथ्वीराज चव्हाण म्हणाले ,’डॉ सप्तर्षी यांनी आंदोलने केली पण ,आक्रस्तळे पणा केला नाही . विचारांची ताकद जीवनातून दाखवली . आज मूलभूत संघर्ष सुरु आहे . ज्या विचाराने देश मागे गेला ,तोच विचार पुढे आणण्याचे काम होत आहे . आता मूलभूत लढाई करण्याची गरज निर्माण झाली आहे . नव्या क्रांतीची गरज आहे ,मात्र डॉ सप्तर्षी यांनी त्यासाठी रस्त्यावर उतरू नये ,तर आधुनिक तंत्राचा वापर करून क्रांती घडवावी . ‘
सत्काराला उत्तर देताना डॉ कुमार सप्तर्षी म्हणाले ,’ विचारशून्यता हे राजकारणाचे वैशिष्ट्य होत असताना ,शेवटच्या क्षणापर्यंत साथ देणारा विचार डोक्यात बाळगण्याची गरज आज आहे . दुसऱ्यातील माणूस जागा करणारा माणूस हाच जास्त खतरनाक आणि अवध्य असतो ,म्हणून तो घडविण्याची गरज आहे . चुकीच्या माणसांनी समाजवाद सांगितल्याने तो मागे पडला असे सांगून ते म्हणाले की त्यामुळे मी जीवनात एकही चुकीची गोष्ट सांगणार नाही ,आपल्याकडे आलेल्या तरुण पिढीला चुकीचे मार्गदर्शन करणार नाही असा निर्धार केला . जयप्रकाश नारायण ,एसेम जोशी,बाबा आमटे यांच्यासारखे गुरु आज नसल्याने नव्या पिढीला योग्य मार्गदर्शन होईल याची काळजी घेतली पाहिजे .
जातीपातींनी मनुष्याला गोंधळून टाकले असल्याने त्या मोडल्या पाहिजेत आणि निर्वैर आंदोलनाच्या मार्गाने पुढे गेले पाहिजे . घरी उर्मिला यांच्याबरोबर होणाऱ्या गप्पा याच प्रत्येक आंदोलन किंवा अटकेनंतरचे टॉनिक होते असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले
‘श्रेय वादासाठी न झगडता ,लाभाची अपेक्षा न ठेवता काम करणाऱ्या पिढीचा हा सत्कार आहे . पुरोगामी विचारांची चळवळ पुढे नेण्याचे श्रेय हे सर्व कार्यकर्त्यांच्या पत्नींना आहे ‘ असे अध्यक्ष स्थानावरून बोलताना न्या . नरेंद्र चपळगावकर यांनी सांगितले
डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या जीवन गौरव समारंभानिमित्त ‘डॉ.कुमार सप्तर्षी गौरव अंकाचे’ प्रकाशन करण्यात आले. ‘सत्ताबदलाची दोन वर्षे’ आणि माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्यावर डॉ.कुमार सप्तर्षी यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रकाशन देखील यावेळी करण्यात आले.तसेच यावेळी डॉ.कुमार सप्तर्षी यांच्या जीवनावर आधारित चित्रफित दाखविण्यात आली.
उपस्थित मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली .मानपत्राचे वाचन संदीप बर्वे यांनी केले . रवीन्द्र धनक यांनी प्रास्ताविक केले . अप्पा वनारसे यांनी आभार मानले तर सुधीर गाडगीळ यांनी सूत्र संचालन केले .
सोमवार, दिनांक 29 ऑगस्ट रोजी डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या कर्जत येथील खेड या जन्मगावी तसेच कर्मभूमी राशीन येथे रक्तदान शिबिर, वक्तृत्व स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.