मुंबई-मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे माझे चांगले मित्र आहेत मात्र त्यांची राजकीय वक्तव्ये आणि व्यंगचित्रे गांभीर्याने घेण्याची गरज नाही अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले आहे. पाच राज्यांचे निकाल आल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाणा साधत पप्पू आता परमपूज्य झाला असे म्हटले होते. या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या खास शैलीतून उत्तर दिलं आहे.
पाच राज्यांमधल्या निवडणुकांमधून जनतेने चांगला पायंडा पाडला आहे. इतके दिवस भाजपाचे नेते राहुल गांधींना पप्पू म्हणून हिणवत होते. मात्र राहुल गांधी आता परमपूज्य झाले आहेत असे राज ठाकरेंनी म्हटले होते. त्याच टीकेला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देत राज ठाकरेंना गांभीर्याने घेऊ नका असे म्हटले आहे. राज ठाकरेंकडे फक्त आपली मतं मांडतात, त्यांच्याकडे बाकी काही काम नाही. त्यामुळे त्यांना कोणीही गांभीर्याने घेऊ नका असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या टीकेबाबत जेव्हा मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी राज ठाकरेंना खूप गांभीर्याने घेऊ नका असे म्हणत त्यांच्या टीकेतली हवाच काढून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याला ठाऊकच आहे की मनसे अध्यक्ष राज ठाकरे सरकारविरोधात भूमिका घेत असतात. व्यंगचित्रातूनही व्यक्त होत असतात. राज ठाकरे जे काही बोलतात ते त्यांचे मत असते त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
भाजपाच्या पराभवाबद्दलही मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा हा पराभव आहे असे आम्हाला वाटत नाही कारण मध्यप्रदेश आणि राजस्थान या दोन राज्यांमध्ये थोड्या फरकाने ते जिंकले आहेत. छत्तीसगढमध्ये आमची सपशेल हार झाली आहे त्यावर आम्ही आत्मपरीक्षण आणि चिंतन करतो आहोत असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.